काशी, मथुरा प्रकरणी मायावतींचे आश्वासन, तर प्रियांका गांधींची दुर्गाभक्ती
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक आता पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र, यंदा ती वेगळय़ाच वातावरणात लढविली जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत. हे ‘वेगळे’ वातावरण कदाचित हिंदुत्वाचे असू शकेल. कारण धर्मनिरपेक्ष पक्षही हिंदुत्वाच्या ध्येयधोरणांवर भर देतील अशी शक्यता आहे.
हिंदुत्वाच्या धोरणांचा भारतीय जनता पक्षाला झालेला लाभ पाहता इतर पक्षही आता हेच धोरण अवलंबिताना दिसून येत आहेत. अयोध्या, काशी आणि मथुरा येथील धार्मिक अभियांनांना आपण सत्तेवर आल्यास विरोध करणार नाहीं, असे आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी दिले आहे. लखनौ येथे आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी अयोध्येसमवेत काशी आणि मथुरा यांचाही उल्लेख केल्याने त्यांच्या राजकीय धोरणातील परिवर्तन स्पष्ट होत आहे. आजवर ‘अयोध्या, काशी, मथुरा’ हे हिंदुत्ववाद्यांचे घोषवाक्य होते. आता ते स्वीकारण्याची तयारी धर्मनिरपेक्ष पक्षांनीही केल्याचे दिसून येते.
समाजवादी पक्षही…
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आपल्या यांनी आपल्या समाजवादी पक्षाच्या प्रचारयात्रेचा आरंभ मंगळवारी केला. त्यांनी प्रारंभबिंदू म्हणून कानपूर येथील गंगेच्या घाटाची निवड केली. त्यापूर्वी सहारणपूर येथे बोलताना त्यांनी हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीतेतील ओळी सांगितल्या. गेले काही महिने ते राज्यातील विविध मंदिरांना भेटी देत आहेत. त्यात कामदगिरी मंदीर, विमलनाथ मंदीर, बुद्ध मंदीर व इतर अनेक मंदिरांचा समावेश होता.
प्रियांका गांधी दुर्गेच्या चरणी
या शर्यतीत प्रियांका गांधीही मागे नाहीत. त्यांनी काही दिवसांपूर्वी बनारस येथे सभा घेतली. त्यापूर्वी त्यांनी शहरातील दुर्गामातेच्या मंदिरात पूजाअर्चा करुन दर्शन घेतले. राहुल गांधीही उत्तर प्रदेशातील अनेक मंदिरांना भेटी देत आहेत.
ही तर नौटंकी…
भाजपने मात्र धर्मनिरपेक्ष पक्षांच्या या देव आणि धर्मप्रेमाला निवडणुकीचा हातखंडा ठरविले आहे. ही चक्क नौटंकी असून इतर वेळी देव आणि हिंदू धर्माच्से नाव घेणेही निषिद्ध मानणारे हे पक्ष आज अचानक धर्मप्रेमी झाले आहेत. हा मतदारांना फसविण्याचा प्रकार असून मतदार असे प्रभावित होणार नाहीत. त्यांना या पक्षांचे खरे चेहरे माहित आहेत, असा टोला भाजपने लगावला आहे.