भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उर्वरित आयपीएल स्पर्धेचे आता भारतात आयोजन करणे अशक्य आहे. या स्पर्धेचा उर्वरित टप्पा विदेशातच खेळवावा लागेल, अशी स्पष्टोक्ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली. मात्र, याचवेळी उर्वरित 31 सामन्यांसाठी असा विंडो उपलब्ध होणार का, याबद्दल त्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करणे शिताफीने टाळले.
टी-20 क्रिकेट वर्तुळातील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या आयपीएल स्पर्धेला मागील आठवडय़ात प्रतिकूल परिस्थितीमुळे नाईलाजाने स्थगिती द्यावी लागली होती. सध्या या स्पर्धेत आणखी 31 सामने होणे बाकी आहे. संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड व श्रीलंका आदी देशांच्या मंडळांनी उर्वरित टप्पा आयोजित करण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे. तूर्तास, सध्याच्या स्थितीत ही स्पर्धा भारतात खेळवणे शक्य नाही, हे स्पष्ट झाले आहे.
‘भारतात 14 दिवस क्वारन्टाईन सक्तीचे आहे आणि एकदा स्पर्धा स्थगित झाल्यानंतर हा कालावधी प्रत्येकाने देणे कठीण आहे. त्यामुळे, उर्वरित टप्पा भारतात घेण्याची शक्यता जवळपास मावळली आहे’, असे गांगुली येथे स्पष्टपणे म्हणाले.
वार्विकशायर, सरे व मेरिलबोन क्रिकेट क्लबनी (एमसीसी) सप्टेंबरमध्ये आयपीएलचा उर्वरित टप्पा घेण्याचा प्रस्ताव मंडळासमोर ठेवला. पण, अद्याप त्यावर चर्चा झाली नसल्याचे बीसीसीआयकडून सांगितले गेले आहे. यापूर्वी गतवर्षीची आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या अस्मानी संकटामुळेच पूर्णपणे संयुक्त अरब अमिरातीत खेळवली गेली होती.
भारतीय संघ लंका दौऱयावर
भारताचा दुसऱया फळीतील क्रिकेटपटूंचा संघ येत्या जुलैमध्ये लंका दौरा करेल, अशी महत्त्वाची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी याप्रसंगी केली. उभय संघात यावेळी 3 वनडे व 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा वरिष्ठ संघ जूनच्या पहिल्या टप्प्यात इंग्लंडला रवाना होणार असून तेथे साऊदम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध ते डब्ल्यूटीसी (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) फायनल खेळतील. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची महत्त्वपूर्ण मालिका देखील होणार आहे.