कोविड तांत्रिक समितीचा राज्य सरकारला सल्ला
प्रतिनिधी /बेंगळूर
शेजारील राज्य केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत सुरू करू नयेत, असा सल्ला कोविड तांत्रिक सल्लागार समितीने राज्य सरकारला दिला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 26 जुलैपासून पदवी महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ नववी ते बारावीपर्यंतचे वर्गही कोविड मार्गसूचीचे पालन करून सुरू करता येतील, अशी शिफारस शिक्षण तज्ञांनी केली होती. मात्र, आठवडाभरापासून केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातही रुग्णवाढीचा धोका आहे. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत शाळा सुरू करणे योग्य नाही, असे मत राज्य सरकारने कोरोनासंबंधी नेमलेल्या कोविड तांत्रिक सल्लागार समितीने व्यक्त केले आहे.
सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याचा धोका आहे. त्यामुळे 16 ऑगस्टपर्यंत शाळा सुरू करू नयेत. राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर कठोर निर्बंध लागू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी दिली.
नागरिकांनी देखील कोविड मार्गसूचीचे पालन करून कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.