ऑनलाईन टीम / मुंबई :
परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घ्यावी, या मागणीसाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले असून, त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घराबाहेर आंदोलन छेडले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करावा लागला.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शाळा ऑनलाईन होत्या. मग परीक्षाही ऑनलाईनच घेण्यात याव्यात, ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धारावीत मोठय़ा संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.