मन हादरवून टाकणारी छायाचित्रे समोर
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमधील आग आता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. या आगीने 20 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. याचबरोबर सुमारे 50 कोटी प्राणी तसेच पक्ष्यांना या वणव्यामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या या आगीच्या संकटाने ऑस्ट्रेलियात हाहाकार उडविला आहे.
या संकटादरम्यान हृदयाला पिळवटून टाकणारे एक छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या छायाचित्रात कांगारूचे पिल्लू जळालेल्या स्थितीत कुंपणाच्या तारेला चिकटलेले दिसून येते. आगीपासून बचावाकरता पळत असताना कांगारूचे पिल्लू तारेत अडकून पडले. तारेत अडकल्याने हे पिल्लू जळून खाक झाले आहे. ही घटना दर्शविणारे छायाचित्र अत्यंत विचलित करणारे आहे. हे छायाचित्र पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
जंगलातील आगीमुळे आतापर्यंत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. 4 महिने उलटून देखील ऑस्ट्रेलियातील वणवा अधिकच भडकत चालला आहे. आतापर्यंत 50 कोटी प्राण्यांचा मृत्यू आगीत होरपळल्यामुळे झाला आहे. या प्राण्यांमध्ये कांगारू, पक्षी आणि सरपटणाऱया जीवांचा समावेश असल्याचा अनुमान युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या पर्यावरणतज्ञाने व्यक्त केला आहे.
आगीत अडकलेल्या प्राण्यांना वाचविण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. पण किती प्राणी अद्याप जिवंत आहेत हेच अद्याप समजू शकलेले नाही. ऑस्ट्रेलियातील सुमारे 15 दशलक्ष एकर क्षेत्रातील जंगल जळून खाक झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया प्रांतांमधील वणवा पाहता आणीबाणी घोषित करत मार्गांवरील वाहतूक रोखली आहे. स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना तेथून बाहेर काढले जत आहे. व्हिक्टोरिया, न्यू साउथ वेल्स आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया प्रांतांमध्ये वेगवान वाऱयामुळे शनिवारी आग आणखीनच पसरली आहे. या प्रांतांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. पश्चिम सिडनीच्या पेनरिथमध्ये 48.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
वणव्या न्युझीलंडमध्ये प्रभाव
ऑस्ट्रेलियातील वणव्यांचा प्रभाव न्युझीलंडमयेही दिसून येतोय. तेथील लोक आपत्कालीन सेवेवर सातत्याने फोन करून आकाशाला नारिंगी रंग प्राप्त झाल्याची माहिती देत आहेत. मागील काही काळापासून धूराने दक्षिण बेटाच्या बहुतांश हिस्स्यांना झाकोळले असल्याने हिमखंडांचा रंगच बदलला आहे. ऑस्ट्रेलियातील धूर आता बेटाच्या उत्तर हिस्स्यापर्यंत पोहोचला आहे.
भारताचा दौरा रद्द
ऑस्ट्रेलियातील वणव्याचे संकट पाहता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 13 जानेवारीपासून सुरू होणारा स्वतःचा 4 दिवसीय भारत दौरा रद्द केला आहे. आगमी काळात योग्य वेळ पाहून दौरा निश्चित केला जाणार असल्याचे मॉरिसन यांनी सांगितले आहे. सद्यकाळात ऑस्ट्रेलियात वणव्याच्या संकटाला तोंड देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.