मुंबई \ ऑनलाईन टीम
ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीयांचं एकमत झालं असल्याची माहिती आहे. OBC आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. आता यासंदर्भात पुढील शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी बैठकीत काय झालं याची माहिती माध्यमांना दिली. ओबीसी आरक्षण कायम ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. त्यावर मार्ग कसा काढता येईल यावर चर्चा झालेली आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आणि त्यावेळी अंतिम निर्णय घेतला जाणार अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र या महत्वाच्या सर्वपक्षीय बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थित होते.