- जावेद अख्तर मानहानी प्रकरण
ऑनलाईन टीम / मुंबई :
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानौत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. कंगनाने विविध मुलाखतीत त्यांची बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला होता. आता या प्रकरणात कंगना रानौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली आहे.
काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ती म्हणाली होती की, एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितले होते की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझे नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असे का वाटते की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल.
कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले होते. त्यानंतर कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
दरम्यान, कंगनाला वारंवार समन्स बजावण्यात आले आहेत तरी देखील ती काही उत्तर देत नसल्याने न्यायालयाने कांगनाला नोटीस बजावली असून 1 मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.