विविध प्रशिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत क्रीडामंत्र्यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कबड्डी केवळ भारत व आशियातच विकसित होऊ शकते असे नसून जागतिक स्तरावर विकसित होण्याची त्यात क्षमता आहे. त्यामुळे कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देणे हे आपले अंतिम ध्येय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे.
‘आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा याआधीच समावेश करण्यात आलेला आहे. आता ऑलिम्पिकमध्येही त्याचा समावेश होण्यासाठी आशियातील सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे आणि हेच आमचे अंतिम ध्येयही आहे,’ असे रिजिजू म्हणाले. ‘हे ध्येय साध्य करण्यासाठी भारतातील या खेळाचा दर्जा आणखी उंचावण्याची गरज आहे. तसेच देशातील आणि जगभरातील जास्तीत जास्त ठिकाणी त्याचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक आहे,’ असेही त्यांनी सांगितले. भारतीय क्रीडा प्राधिकरणने 20 क्रीडा प्रकारांतील प्रशिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात भारतातील तसेच कोरिया, मलेशिया यासारख्या अन्य देशांतील सुमारे 700 हून अधिक कबड्डी प्रशिक्षकांना मार्गदर्शन करताना रिजिजू बोलत होते.
ऑनलाईन कार्यशाळेचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले की, ‘देश सध्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देत असून आम्ही ही लढाई निश्चितच जिंकणार आहोत. हे युद्ध जिंकल्यानंतर लवकरच आम्ही पुन्हा मैदानावर ट्रेनिंगसाठी आणि खेळण्यासाठी उतरणार आहोत. पण ते साध्य होईपर्यंत उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घ्यावा लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे नियमातील बदल व अन्य घडामोडींच्या ताज्या माहितीसाठी प्रत्येकाने अपडेट राहणे महत्त्वाचे आहे. खेळाचे नियम व शर्ती वरचेवर बदलत असतात. त्याची ताजी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जे अपडेट राहत नाहीत, त्यांची पिछेहाट व्हायला वेळ लागत नाही. विदेशी संघांकडून आम्हाला नेहमीच पराभव स्वीकारावा लागतो. कारण नियमांच्या ज्ञानाच्या बाबतीत ते आपल्यापेक्षा बरेच पुढे असतात. ही ऑनलाईन कार्यशाळा त्याच हेतूने सुरू करण्यात आली असून यापुढे कोणीही मागे राहणार नाही, याची मला खात्री वाटते,’ असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्ससमवेत साईने प्रशिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेचे कौतुक करीत ते म्हणाले, ‘रोज चालणाऱया या कार्यशाळेत 20 विविध क्रीडा प्रकारांतील सुमारे 8000 प्रशिक्षक सहभागी होऊन खेळासंबंधी आपल्या ज्ञानात नवी भर घालत आहेत. सध्याच्या काळात क्रीडा जगतातील ही सर्वात मोठी कार्यशाळा ठरली असून असा उपक्रम यशस्वीरीत्या राबविता येऊ शकतो, याचा मला आनंद व अभिमान वाटतो. देशातील विविध फेडरेशन्सनी सहकार्य केल्याने तसेच क्रीडा मंत्रालय, क्रीडा फेडरेशन्स व खेळांशी संबंधिक घटक यांच्यातील चांगल्या संबंधामुळेच हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविता आला आहे. भारतीय क्रीडाक्षेत्राची प्रगती होण्यास त्याची निश्चितच मदत होईल,’ अशा भावनांही त्यांनी व्यक्त केल्या.