प्रतिनिधी/कराड
कराड नगरपालिकेच्या अथक प्रयत्नांना नागरिकांनी मनःपूर्वक साथ दिल्याने आपले कराड शहर कोरोनापासून काही अंशी दूर राहिले आहे. सध्या शासनाच्या धोरणानुसार पर जिल्ह्यातून विशेषतः मुंबई पुण्यातून तसेच पर राज्यातून कराड तालुक्यात येणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. येत्या काही महिन्यात कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनासाठी प्रतिबंधात्मक लस निघेपर्यंत आपणा सर्वांना कोरोना विषाणूशी लढा देण्याची आवश्यकता आहे , live with कोरोना ही आपली जीवनशैली बनवली पाहिजे. यासाठीच कराड नगरपालिकेने ” मीच माझा रक्षक’ हे अभियान सुरू केल्याची माहिती कराड नगरपालिकेचा मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
कराड शहर कोरोना मुक्त झाले आहे. नगरपालिकेच्या उपाययोजनांना नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने हे शक्य झाले आहे. यापुढेही आपण सर्वांनी दक्षता घेतल्यास कराड परिसरातील कोरोनाचा फैलाव निश्चितच रोखला जाऊ शकतो. आपण त्यासाठी खालील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
1)दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी, त्याने मास्क घातला असेल तरच मालविक्री करावी,आलेल्या ग्राहकांच्या हातावर सॅनिटाईझर द्यावे.
2)दुकानात येणारे कामगार कोरोनाबाधित गावातून येत असल्यास त्यांना तात्पुरती सुट्टी द्यावी.
3)काउंटरवर गर्दी न करता सोशल डिस्टन्सचे नियम पाळून विक्री करावी.
4) सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांनी कडी,कोयंदा,नळ आदी वस्तूंशी कमीतकमी वेळा स्पर्श करावा व त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी, यामध्ये काही त्रुटी असल्यास नगरपालिकेशी संपर्क साधावा.
5) भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
6)रस्त्यावरून चालताना एकमेकात अंतर ठेवून चालावे,कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये, हाताचा स्पर्श चेहऱ्याला करणे शक्यतो टाळावे.
7)रस्त्यावर वाहन चालवताना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
8) नागरिकांनी गरजेपुरतेच बाहेर पडावे तसेच अनावश्यक गर्दी करू नये,तसेच कोणाशीही दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ संपर्क साधू नये,
9)भाजीपाला व फळे घरी आल्यावर दोन तास बाजूला ठेवावीत,त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवाव्यात,
10)धान्य व वाणसामान आणल्यावर बाजूला ठेवावे व दुसऱ्या दिवशी प्रक्रिया करून डब्यात भरून ठेवावे,
11)सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकु नये कारण यातून जंतूंचा फैलाव वेगाने होऊ शकतो,
12)दर दोन तासांनी दोन्ही हात साबणाने 20 सेकंद चोळून स्वछ धुवावेत,
वरील नियमांची बाराखडी आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक घोटवून पाळल्यास आपण कोरोनाचा फैलाव नक्की रोखू शकतो, आपल्या गावाचे, आपल्या बंधुभगिनींचे रक्षण करून कोरोनामुक्तीत अग्रेसर होऊ शकतो.शहरात घरात विलगी करण केलेल्या लोकांनी घरातच थांबायचे आहे. असे लोक बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याबरोबरच शहरात फिरताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी शक्य तितक्या वस्तू घरपोच मिळवण्याचा प्रयत्न करावा. गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे.