बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. दरम्यान संपाच्या काळात चार राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (आरटीसी) जवळपास ६० बसेसचे नुकसान झाले आहे, तर ७ ते १३ एप्रिल दरम्यान झालेल्या बस संपच्या पहिल्या सहा दिवसात कमीतकमी एका बसच्या चालक आणि वाहकांवर हल्ला करण्यात आला आहे.
आरटीसीकडून झालेल्या नुकसानीची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी जाहीर केली. केएसआरटीसीच्या सर्वाधिक ३४ बसचे नुकसान झाले आहे. तुमकूरजवळील बसवर दगडफेक झाल्यानंतर जखमी झालेल्या चालक व वाचकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसर्या घटनेत कोलारजवळ बसच्या चालकाकडे पेट्रोल टाकण्यात आले. दरम्यान एनईकेआरटीसीच्या २० बसेसचे नुकसान, तर बीएमटीसी आणि एनडब्ल्यूकेआरटीसीने दिलेल्या माहितीनुसार तीन बसचे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अधिकाऱ्यांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या उपद्रव्यांविरूद्ध कठोर कारवाई सुरू करण्याच्या व संपावरील कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्यानंतर एका दिवसानंतर हा डेटा जाहीर करण्यात आला.