बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांच्या डोक्यावरील छत्र हरपल्याने जगायचं कस असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. घरातील कमवत्या व्यक्ती गमवल्याने अनेक वृद्ध दाम्पत्य निराधार झाली आहेत. यासाठी केंद्रासह राज्य सरकार पुढे सरसावत या कुटुंबांना मदतीचा हात देत आहे. मध्य प्रदेश सरकारने आई वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांना ५ हजार रुपये प्रति महिना पेन्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. दिल्ली सरकारनेही अशा कुटुंबासाठी विविध घोषणा केल्या आहेत. आता कर्नाटकातील कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील कुटुंबांसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. मंत्री पाटील यांनी आपल्या मतदार संघातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
कर्नाटकातील हिरेकेरुर मतदारसंघातील कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना ५० हजार रुपये देण्याची त्यांनी घोषणा मंत्री पाटील यांनी केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बी. सी. पाटील आपल्या खिशातून ही मदत दिली जाणार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मंत्री बी. सी. पाटील हिरेकेरून मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मंत्री पाटील यांच्याकडे कृषी राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे.