ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘एअरबस’ या विमान निमिर्ती क्षेत्रातील कंपनीने आपल्या 1 लाख 35 हजार कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून कोरोना संकटामुळे कंपनीचे अस्तित्व धोक्यात असल्याची माहिती दिली आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या कर्मचारी कपातीस तयार राहण्यास सांगितले आहे.
कोरोनामुळे एअरबससारखी बलाढ्य कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. कंपनीने या संकटाची कल्पना कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून दिली आहे. एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिलम फरी यांनी आपल्या 1 लाख 35 हजार कर्मचाऱ्यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. कंपनीचा हा अंतर्गत पत्रव्यवहार असल्याने एअरबसने याबाबतची माहिती समोर आणली नाही.
लॉकडाऊनचा फटका हवाई वाहतूक क्षेत्राला बसला आहे. त्याचा थेट परिणाम विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नावर दिसत आहे. लॉकडाऊननंतरकंपनीच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे एअरबसने पहिल्या तिमाहीतील ताळेबंद जाहीर करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून सद्यस्थितीची कल्पना दिली.