भगदाड पडल्याने वाहनधारकांना नाहक त्रास : दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांतून तीव्र नाराजी : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर / किणये
कर्ले-बेळवट्टी संपर्क रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाच वर्षापासून रस्ता पूर्णपणे खड्डय़ांनी व्यापला आहे. बहुतांशी ठिकाणी रस्ता उखडून गेला असल्याने रस्त्याचे अस्तित्व नष्ट झाले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
कर्ले-बेळवट्टी या संपर्क रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. यामुळे रस्त्याच्या बाजुचा काही भाग वाहुनही गेला आहे. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पाच ते सहा ठिकाणी रस्त्याच्या बाजुनी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत.
कर्ले, बेळवट्टी, इनाम बडस, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप आदी गावातील नागरिकांसाठी हा संपर्क रस्ता महत्त्वाचा आहे. शेत शिवारात व परिसरातील गावांकडे जाण्यासाठी या रस्त्यावरून वाहनधारक ये-जा करीत असतात. मात्र सध्या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. बेळवट्टी व कर्लेतील शेतकरी रोज या रस्त्यावरूनच शिवाराकडे जातात. त्यामुळे परिसरातील वाहनधारकांसाठी शेतकऱयांना हा महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची गरज आहे. या रस्त्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी का पुढाकार घेत नाहीत का? असा सवाल नागरिकांतून होऊ लागला आहे. या रस्त्यावरील बेळवट्टी गावाजवळ असलेला पुलही वाहून गेला आहे.
वाहनधारकांना ग्रामस्थांचे आवाहन
जोरदार पाऊस झाल्यामुळे पुलाखालील पाईपच बाहेर येऊन पडली आहे. या ठिकाणी रात्रीची वाहतूक अत्यंत धोकादायक ठरणारी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांनी सतर्कता बाळगुनच यावे, असे बेळवट्टी ग्रामस्थांच्यावतीने आवाहनही करण्यात आले आहे.
संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी रस्त्याची पाहणी करून व परिसरातील शेतकरी व वाहनधारकांचे होणारे हाल लक्षात घेऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.