माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे : सतीश जारकीहोळी यांना विजयी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेस हा गोरगरीब, मध्यमवर्गीय आणि दलितांचा पक्ष आहे. गोरगरीब जगावा यासाठी जीवनावश्यक वस्तुंसह इंधनाचे दर नियंत्रणात ठेवले होते. मात्र, भाजपने दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे, असा आरोप करत आर. व्ही. देशपांडे यांनी भाजपवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुतळय़ाला हार अर्पण करून त्यांनी प्रचारादरम्यान भाजपवर टीका केली.
येळ्ळूर, मच्छे, पिरनवाडी या परिसरात बुधवारी प्रचार केला. सर्वसामान्य मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे त्यांनी विविध ठिकाणच्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ांना हार अर्पण करून अभिवादन केले. महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली असून जीवन जगणे अवघड झाले आहे. भविष्यात उपासमारीमुळे अनेकांना जीवन संपवावे लागेल. तेव्हा देशाला लागलेली भाजपची कीड वेळीच थांबविणे गरजेचे असून काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना बहुमोल मत देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या 15 दिवसांपासून माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी दक्षिण मतदारसंघ पिंजून काढला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. प्रत्येक मतदाराला भाजपने दिलेली आश्वासने कशी निष्फळ ठरली आहेत, याची माहिती त्यांनी दिली. आश्वासने देऊन भाजप सर्वांचीच फसवणूक करत आहे. तेव्हा काँग्रेसच्या पाठीशी तुम्ही ठामपणे रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी जि.पं. सदस्य रमेश गोरल, येळ्ळूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष किरण पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.