विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींचा निर्णय : कित्येक वर्षांपासून समित्यांमध्ये झाला नव्हता बदल
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व गटसमित्या आणि जिल्हा समित्या अखिल भारतीय काँग्रेस समितीने बरखास्त केल्या असून जिल्हाध्यक्षांना मात्र कायम ठेवले आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी या संदर्भातील आदेश जारी केला असून गट समित्या, जिल्हा समित्या एका महिन्यात नव्याने स्थापन करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आणि प्रामुख्याने गोवा राज्याचे काँग्रेस निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पक्षाच्या गटसमित्या, जिल्हा समित्या गेल्या अनेक वर्षांपासून तशाच होत्या आणि त्यात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. अनेक गटसमित्या तर फक्त कागदावरच होत्या आणि प्रत्यक्ष कार्यरतच नसल्याने असून नसल्यातच जमा होत्या. याची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेऊन सर्व समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षीय सूत्रांनी सांगितले.
तक्रारीची पी. चिदंबरम यांच्याकडून दखल
निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष अधिक सक्रिय बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आता सर्व समित्यांवर नवीन आणि तरुण सदस्यांना नेमण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. अनेक समित्या फक्त नावालाच असून त्या कार्यरत नसल्याच्या तक्रारी पी. चिदंबरम यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याची तातडीने दखल घेऊन अखिल भारतीय काँग्रेस समिती पक्षश्रेष्ठींनी समित्या रद्द करुन त्या नव्याने नेमण्याचे ठरवले आहे.
तरुण, सक्रिय सदस्यांना स्थान मिळणार
नव्याने समित्या स्थापन करताना सक्रिय सदस्यांना स्थान देण्यात येणार असून तरुण रक्तालाही वाव दिला जाणार आहे. जुन्या व निष्क्रीय सदस्यांना बाजूला सारण्यात येणार असून काँग्रेस पक्षाची तळागाळातून पुन्हा एकदा बांधणी करण्याचे पक्षश्रेष्ठींनी निश्चित केले आहे. पी. चिदंबरम आणि गुंडूराव हे दोघेही आता सातत्याने गोव्यात येणार असून पक्षाची समित्यांसह नव्याने बांधणी करणार असल्याचे पक्षीय सूत्रांनी नमूद केले.