प्रदूषण मंडळ कारवाई कधी करणार ?
वारणानगर / प्रतिनिधी
काखे ता.पन्हाळा येथे वारणा नदीवरील नवीन तयार होत आलेल्या मांगले – काखे पूलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशाचा खच लागला आहे. नदीत प्रदूषित पाणी सोडणाऱ्यावर प्रदूषण मंडळ कारवाई कधी करणार असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे.
गेल्या दोन दिवसापासून नदी पात्रात मृत मासे तरंगताना दिसत आहेत. या मृत माशांचा अक्षरश: खच कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीवर नविन बांधण्यात येत असलेल्या मांगले – काखे पुलाजवळ पहायला मिळत आहे. वारणा नदी काठच्या दोन्ही बाजूंना मेलेल्या माशांची दुर्गंधी येत आहे. वारणा नदी काठावरील बहूतेक गावांच्या पीण्याच्या पाण्याच्या योजना वारणा नदीवर आहेत, खराब पाण्यामुळे मासे मृत झाले असतील तर तेच पाणी लोक पिण्यासाठी वापरतात या लोकांच्या आरोग्याचे काय त्रास होतात यासाठी प्रदूषन महामंडळ काय करणार असा प्रश्न वारणा नदी काठावरील नागरीकांना पडला आहे.
वारणा नदी पात्राच्या मांगले गावाकडील बाजूला व पन्हाळा तालुक्यातील काखे गावाकडील बाजूला मृत माशांचा खच दिसत आहे. दोन्ही बाजूला लहान मोठे मासे दिसत आहेत, गेल्या दोन दिवसा पासूनलहान मोठे मासे बेशुद्धावस्थेत दिसू लागल्याने मोठे मासे पकडण्यासाठी लोकांची नदी काठावर गर्दी दिसत आहे, व्यवसायीक मासेमारी करणा-या लोकांनी रात्री दिवसा मिळेल तेवढे लहान मोठे मासे टेंपोधून घेऊन जावून विक्री केले आहेत. बुधवारीही लोक मासे धरताना पुलाजवळ दिसत होते, तर काही तरूण काखे गावाकडील बाजूला पकडलेले मासे त्याच ठिकाणी शिजवून खात असताना दिसत होते.
या वर्षात अनेकवेळा वारणा नदीत प्रदूषीत पाणी मिसळले त्यामुळे नदीपात्रात मृतमाशाचा खच लागला याबाबत गतवेळी प्रदूषन महामंडळाने नदीत मिसळत असलेल्या पाण्याचे नमूने तपासणीसाठी नेले त्यावर निर्णय होण्यापूर्वी दुसऱ्यांदा पुन्हा तोच प्रकार घडला त्यामुळे पाणी सोडणाऱ्यावर प्रदूषन मंडळ काय व कधी कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.