वार्ताहर/ शिरगुप्पी :
बेळगाव जिल्हय़ात गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कागवाड तालुक्यात अद्याप एकही रुग्ण नसल्याने तालुकावासीयांना दिलासा होता. अशातच अचानक तालुक्यातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. झारखंड येथील शिखरजी येथून तीर्थ यात्रेहून परतलेल्या मोळवाड (ता. कागवाड) येथील तिघांना कोरोना झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.
गेल्या महिन्यात शिरगुप्पी येथील 9 व मोळवाड येथील 6 असे एकूण 15 भाविक झारखंड राज्यातील शिखरजी येथे तीर्थ यात्रेला गेले होते. मात्र 24 मार्च रोजी अचानक लॉकडाऊन करण्यात आल्याने हे भाविक तेथेच अडकून पडले होते. मात्र दीड महिन्यानंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने सदर भाविक खासगी वाहनाने शिरगुप्पीत दाखल झाले होते. यावेळी त्यांना अन्य कोणाच्या संपर्कात येऊ न देता थेट इंगळी रस्त्यावर बीसीएम या शासकीय वसतीगृहात 6 मे रोजी क्वारंटाईन करण्यात आले होते.
यानंतर 19 मे रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी आला. त्यानुसार मोळवाड येथील 73 वर्षीय पुरुष तसेच 63 व 65 वर्षाच्या दोन महिला अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तत्काळ त्यांना बेळगावला हलविण्यात आले. अचानक तालुक्यात कोरोनाची एंट्री झाल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.
अधिकाऱयांची वसतीगृहास भेट
क्वारंटाईनमधील तिघांना कोरोना झाल्यानंतर तत्काळ कागवाड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक हणमंत धर्मट्टी यांच्यासह आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी बीसीएम वसतीगृहास भेट दिली. यानंतर क्वारंटाईन केलेल्या उर्वरित 12 जणांना आणखी 14 दिवसांचा क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.