सावंतवाडी:
ग्राहकांचे काजू बी खरेदी करून त्यांची सुमारे 23 लाख रुपये रक्कम न देता बागायतदारांची फसवणूक करून पसार असलेल्या दोघापैकी मल्लीकार्जुन हरी गावडे (26, रा. सत्तरी-गोवा) याला जिल्हा न्यायालयाने पंधरा हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयितातर्फे ऍड. डी. के. गावकर यांनी काम पाहिले.
ही घटना दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर येथे घडली होती. या बाबतची तक्रार झरेबांबर येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार मल्लीकार्जुन गावडे व दिव्या ओबेरॉय (दोन्ही रा. गोवा) या दोघाविरोधात दिली होती. 6 एप्रिल ते 24 जुलै 2019 या कालावधीत हा प्रकार घडला होता. संशयित दोघानी झरेबांबर येथे बाजारभावापेक्षा दहा रुपये जादा दराने काजू बी खरेदी करण्याचा फलक लावला होता. म्हणून झरेबांबर येथील बागायतदारानी त्या दोघांकडे हजारो किलो काजू बी त्यांना विकले. त्याची रक्कम काही दिवसांनी मिळेल, असा त्यांच्यावर विश्वास ठेवला. काजूची काही रक्कम त्यानी टप्प्यानी दिली. उर्वरित 23 लाख 21 हजार 768 रुपये एवढी रक्कम गावातील 20 बागायतदारांचे देणे बाकी असताना त्या दोघांनी बागायतदारांची फसवणूक करून पलायन केले. अशी तक्रार मोरजकर यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून मल्लीकार्जुन गावडे व त्याची सहकारी दिव्या ओबेरॉय या दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित मल्लीकार्जुन गावडे याचे वकिल डी. के. गावडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ओरोस जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयात अर्जाची सुनावणी होऊन न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. कदम यानी मल्लीकार्जुन गावडे यांना पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर केला, अशी माहिती ऍड. गावकर यांनी दिली.