कैद्यांना शिकविणार अक्षरज्ञान
प्रतिनिधी /बेळगाव
कारागृह व सुधारणा सेवा खात्याच्यावतीने ‘नवचेतन’ कार्यक्रमांतर्गत बेळगावसह राज्यातील 50 कारागृहांत साक्षरता कार्यक्रम सुरू करण्यात आला. राज्यातील 15 हजारांहून अधिक कैद्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. शारीरिक, मानसिक विकासाबरोबरच त्यांना शिक्षण देण्याचा हा उपक्रम आहे.
सोमवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीश व कारागृह अधिकाऱयांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. कैद्यांना पुस्तके वाटण्यात आली. राज्योत्सवाचे निमित्त साधून सामुहिक शिक्षण खात्याच्या सहयोगातून साक्षरता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत कारागृहातील शिक्षण घेतलेले कैदी निरक्षक कैद्यांना साक्षर करणार आहेत. कैद्यांचे स्वाभीमान व आत्मविश्वास जागविणे या मागचा प्रमुख उद्देश आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतरही समाजात कैद्यांनी स्वाभीमानाने जगावे यासाठी त्यांना अक्षरज्ञान दिले जात आहे.
कैद्यांना शिक्षणाची गरज किती आहे? याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 15 हजारांपैकी 7 हजार कैद्यी पूर्णपणे निरक्षर आहेत. 3 हजार कैद्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 2 हजार 100 कैदी बारावी व डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतले आहे. 1 हजार कैदी पदवीधर आहेत. 100 कैदी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आदी शिक्षण पूर्ण केलेले आहेत. अक्षरज्ञानाबरोबरच योगाचे धडेही देण्यात येणार आहेत.