श्रीनगर / वृत्तसंस्था
भारतीय सेना, सीमा सुरक्ष दल आणि काश्मीर पोलीसांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार संघर्ष चालविल्ना असून रविवारी 4 दहशतवाद्यांना अनंतनाग आणि शोपियान येथे कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेले दहशतवादी लष्कर ए तोयबा आणि अल् बद्र या पाकपुरस्कृत संघटनांचे होते, अशी माहिती देण्यात आली. गेल्या तीन दिवसांमध्ये सीमावर्ती भागांमध्ये 11 दहशतवादी ठार झाले आहेत.
रविवारी ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी तौसीफ अहमद भट आणि अमीर हुसेन गानी हे दोघे लष्कर ए तोयबाचे हस्तक होते. दोघेही बिजबेहारा येथे राहणारे असून त्यांच्या नावावर अनेक गुन्हे आणि हिंसाचाराच्या घटना नोंद होत्या. क्षेत्रीय सेनादलाचे सैनिक मोहम्मद सालेम याच्या हत्येचा आरोपही त्यांच्यावर होता. सर्वसामान्य नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, तसेच मुस्लीम युवकांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाकडे आकृष्ट करणे अशी देशविरोधी कृत्ये ते करीत होते, अशीही महिती जम्मू-काश्मीर प्रशासनाने दिली.
दहशतवाद्यांकडून गोळीबार
शोपियान भागात अल बद्रच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या त्यांना प्रथम शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण त्यांनी गोळीबार सुरू केल्याने सैनिकांनीही जशास तसे प्रत्युत्तर देत त्यांना गोळय़ा घालून ठार केले. या भागात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.