पहिल्याच दिवशी तब्बल ४९ तक्रारी
कुपवाड / प्रतिनिधी
महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सोमवारपासून कुपवाडमधून सुरू झालेल्या “महापौर आपल्या दारी” या नव्या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला.
कुपवाडच्या प्रभाग एकमधील आंबा चौक व आर.पी.पाटील चौक या दोनठिकाणी आयोजित पहिल्या बैठकीत नागरिकांनी प्रलंबित रस्ते दुरुस्ती, गटारी, पाणी, पथदिव्यांची समस्या, स्वच्छतेचा अभाव यांसह नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य मूलभूत आरोग्य व नागरी सुविंधा बाबतीत पहिल्याच दिवशी तब्बल ४९ तक्रारी दाखल झाल्या. या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी उपस्थित नागरीकांनी प्रश्नांची सरबत्ती करून महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांसह प्रभागातील नगरसेवकांना चांगलाच घाम फोडला. यावेळी नगरसेबक निरुत्तर झाले. पण, महापौरांनी नागरिकांच्या समाधानापुरती उत्तरे दिली.
महापौर आपल्या दारी या अभियानास सोमवारी कुपवाडमधून प्रारंभ झाला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी कुपवाडच्या प्रभाग क्रमांक एकमधून उपक्रमाला प्रारंभ करत नागरिकांची निवेदने स्वीकारली. सुरूवातीला भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून उपक्रमाला सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी करणारे निवेदन महापौरांना दिले. यावेळी नागरिकांसमोर बोलताना महापौर सूर्यवंशी यांनी कुपवाडमधील प्रलंबित सुविंधा पूर्ण करून भाजी मंडईचा प्रश्नही सोडविणार असल्याचे तसेच कुपवाडमध्ये पहिल्यांदा बगीचे होत असल्याचे सांगितले. यावेळी प्रभाग एकमधील नगरसेवक शेडजी मोहिते,विजय घाडगे, नगरसेविका सौ.रईसा रंगरेज, सौ.पद्मश्री पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.