कुशवाह यांचा ‘आरएलएसपी’ संजदमध्ये विलीन
पटना / वृत्तसंस्था
बिहारमध्ये ‘राष्ट्रीय लोक समता पक्षा’चे (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आपला पक्ष ‘जनता दल युनायटेड’मध्ये (संजद) विलीन केला आहे. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीनंतर त्यांनी हा पवित्रा घेतला आहे. या निर्णयानंतर कुशवाह यांनी पक्ष मुख्यालयात मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत ‘आरएलएसपी’चे आमदारही उपस्थित होते. पक्ष विलिनीकरणामुळे आता हे आमदारही संजदमध्ये सहभागी होणार असल्याने नितीशकुमारांच्या पक्षाचे संख्याबळ वाढणार आहे. या विलिनीकरणाच्या माध्यमातून उपेंद्र कुशवाह आणि नितीशकुमार तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उपेंद्र कुशवाह यांची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जवळीक वाढलेली दिसून येत होती. परंतु, ‘आरएलएसपी’ जेडीयूसोबत आघाडी करणार की विलीन होणार याबाबत काहीच स्पष्ट संकेत मिळत नव्हते. अखेर रविवारी याबाबतचा तिढा संपुष्टात आला असून ‘आरएलएसपी’ आणि ‘जेडीयू’ यांच्यातील विलिनीकरणावर शिक्कामार्तब झाले.
काहींनी साथ सोडली
‘आरएलएसपी’च्या बैठकीआधीच विलिनीकरणाच्या निर्णयावर नाराज होत पक्षातील साथीदारांनी मात्र कुशवाह यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. कार्यकारी प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुशवाह, महासचिव निर्मल कुशवाह यांच्यासह 35 नेते ‘राष्ट्रीय जनता दल’मध्ये सहभागी झाले आहेत. या नेत्यांनी राजदच्या कार्यालयात तेजस्वी यादव यांच्या हस्ते पक्षाचे सदस्यत्वही स्वीकारले आहे. ‘आरएलएसपी’च्या राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदरच ते कुशवाह यांच्यापासून दूर गेले आहेत.
उपेंद्र कुशवाह यांच्यावर साथीदारांचा हल्लाबोल
उपेंद्र कुशवाह यांची साथ सोडणाऱया विरेंद्र कुशवाह यांनी त्यांच्यासह नितीशकुमारांवर तोफ डागली आहे. नितीशकुमार यांना सत्तेतून हटवण्यासाठी ‘आरएलएसपी’ हा पक्ष बनवण्यात आला होता. परंतु, उपेंद्र कुशवाह हा संकल्प विसरले असून त्यांनी नितीशकुमार यांच्यासोबत जाण्याचा घातक निर्णय घेतला. मात्र, आता तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांना सत्तेतून खाली खेचण्याचा आपला संकल्प आहे, असेही विरेंद्र कुशवाह म्हणाले.