अखिल भारतीय किसान सभेची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक इलेक्ट्रिसिटी बोर्ड (केईबी)ने कृषीपंपांना नवीन जोडणी देण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना नाईलाजास्तव विद्युत वाहिनीवर आकडा टाकून वीज घेण्याची वेळ आली आहे. यामुळे सरकारचे नुकसान होत आहे. हे थांबविण्यासाठी कृषीपंपांना वीज जोडणी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने करण्यात आली.
सध्या विहिरी कोरडय़ा पडत आहेत. त्यामुळे कुपनलिका खोदून शेतीला पाणी द्यावे लागत आहे. यामुळे कुपनलिका व विहिरींना पंप बसवावे लागत आहेत. वीज जोडणीसाठी नियमावलीनुसार अनामत रक्कम भरण्यास शेतकरी तयार आहेत. ही रक्कम भरून केईबीने त्वरित कृषीपंपांना वीज जोडून द्यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
सध्या ट्रक्टरने सर्वाधिक शेती केली जाते. परंतु शेतवडीमध्ये ट्रक्टर जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. याकरिता उद्योग खात्री योजनेतून शेतीमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते तयार करावेत. या दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने सरकारला दिला आहे.
यावेळी गुलबर्गा जिल्हा अध्यक्ष मौला मुल्ला, मल्लिनाथ यलशेट्टी, भीमाशंकर माडयाळ, चंद्रकांत खोबरे, भीमराव अरळगुंडगी, खलील उस्ताद आदींनी हे निवेदन दिले आहे.