ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या उद्योगांना उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये कोरोना प्रभावित क्षेत्रासाठी 1.1 लाख कोटींच्या क्रेडिट गँरंटी योजनेची घोषणा करण्यात आली. आरोग्य क्षेत्रासाठीही 50 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. ही रक्कम नॉन मेट्रो मेडिकल इन्फ्रासाठी खर्च करण्यात येणार आहे.
इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी स्किममधील निधी 3 लाख कोटींवरुन 4.5 लाख कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत हॉस्पिटॅलिटी सेक्टरला 2.69 लाख कोटी वितरित केले जाणार आहेत.
लहान मुलांसाठीच्या आरोग्य सुविधेसंदर्भाल्या कामांसाठी या वषी 23,220 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. 31 मार्च 2022 पर्यंत ही रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाल्यानंतर भारतात येणाऱ्या सुरुवातीच्या 5 लाख पर्यटकांना व्हिसासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 31 मार्च 2022 पर्यंत अथवा 5 लाख पर्यटक येईपर्यंत ही योजना लागू होईल.
तसेच ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या 100 च्या आत आहे आणि नवीन कर्मचाऱ्यांचा मासिक पगार 15 हजारपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांचा 12 टक्के आणि कंपनीचा 12 टक्के असा एकूण 24 टक्के पीएफचा हिस्सा हा केंद्र सरकारकडून भरण्यात येणार आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या योजनेतला मुदतवाढ देण्यात आली आहे.