96 हजारची पातळी पार, रोगमुक्ती प्रमाणही वाढले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रविवार संध्याकाळ ते सोमवार संध्याकाळ या चोवीस तासात कोरोनाच्या रूग्णसंख्येत 5 हजार 120 ची भर पडली आहे. ही एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. मात्र याच कालावधीत 2 हजार 715 लोक कोरोनामुक्तही झाले आहे. बरे होण्याचे प्रमाण आता 38.29 टक्के झाले आहे.
सध्या देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण एक लाखामागे 7.1 असे आहे. इतर विकसीत देशांच्या तुलनेत ते पुष्कळच सुसहय़ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 30 हजार 102 इतकी आहे. देशात एकंदर मृत्यू 3 हजार 32 इतके आहेत. देशातील एकंदर रूग्णांपैकी 50 टक्के रूग्ण केवळ मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकता या 5 शहरांमध्ये आहेत. महाराष्ट्रातील रूग्णसंख्या देशाच्या रूग्णसंख्येच्या 32 टक्के इतकी आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये रूग्ण आहेत. गुजरातमधील रूग्णांपैकी 75 टक्के एकटय़ा अहमदाबाद जिल्हय़ात आहेत अशीही माहिती देण्यात आली.