मुख्यमंत्र्यांच्या परिसंवादामध्ये पंतप्रधानांचा विश्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर दोन आठवडय़ांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 21 राज्यांच्या मुख्यमंत्री, उपराज्यपालांशी संवाद साधला. सध्या देशातील कोरोनाबाधितांचा बरे होण्याचा दर 50 टक्के झाला ही समाधानकारक बाब असल्याचे ते म्हणाले. या पुढील काळात अधिक सावधानता आवश्यक असून स्वयंशिस्तीने नियम पालन कराल तर कोरोना रोखला जाईल आणि अर्थव्यवस्था गती घेईल, रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला. मास्कशिवाय बाहेर पडण्याचा विचारच करु नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
डिजिटल माध्यमातून 21 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. येथे तुलनेने कोरोना संसर्गाचे व मृत्युचे प्रमाण कमी आहे. 20 हजारपेक्षा कमी रुग्ण आणि 150 पेक्षा कमी मृत्यु झाले आहेत. या राज्यांमध्ये वास्तुस्थिती आणि सूचना त्यांनी जाणून घेतल्या. कोरोनाशी लढा देताना अर्थव्यवस्थेला गती देण्याकरता धोरण आखण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. याआधी 11 मे रोजी त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता.
या राज्यांशी झाली चर्चा
पंजाब, चंदीगढ, उत्तराखंड, हिमाचल, लडाख, झारखंड, छत्तीसगढ, गोवा, केरळ, पाँडेचरी, असाम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचलप्रदेश, मिझोराम, सिक्किम, मणिपूर, नागालँड, अंदमान-निकोबार, दादारनगर हवेली व दमण दीव, लक्षद्वीप यांचा समावेश आहे.
आज या राज्यांशी होणार चर्चा
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्री, उपराज्यपाल तसेच जम्मू काश्मीरच्या उपराज्यांपालांशी चर्चा करणार आहेत. यातील जम्मू काश्मीर वगळता अन्य राज्यांमध्ये रुग्णसंख्या आणि बळींची संख्याही अधिक आहे.
अनलॉक 1 मध्ये
लॉकडाऊन कालावधीत उद्योग, व्यवसाय, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरानाला काहीसा आळा बसला असला तरी अर्थव्यवस्था थबकली आहे. तिला गती देण्यासाठी अनलॉक 1 मध्ये सामान्य नागरिक तसेच अनेक व्यवसायांना सवलती आणि सूट दिली आहे. यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ शकेल.
जनजवीन, व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी
देशातील जनजीवन आणि व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायजर, हँण्डवॉशचा वापर याचाही पुनरुच्चार केला. भविष्यात बाजार, वाहतूक व्यवस्था, विविध कार्यालये, आस्थापना, उद्योग सुरु होण्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखला पाहिजे. तरच अर्थव्यवस्था आणि जनजीवन पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
जगभर भारताची चर्चा
कोरोना महामारीचा भारत यशस्वीपणे मुकाबला करत असल्याचे जगभरातील तज्ञ, आरोग्यविषयक जाणकार, सल्लागार मान्य करत आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील जनतेने लॉकडाऊन काळात दाखवलेली स्वयंशिस्त आणि अनलॉक नंतर पाळत असलेले नियम याचेही कौतुक होत आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर आहे. आणि लोकसंख्येच्या तुलनेत भारतात मृत्युदर कमी आहे, हे त्यांनी मान्य केल्याचेही मोदींनी सांगितले.
कृषी उत्पादने, स्थानिक मालाला प्राधान्य द्या
शेतकऱयांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य दर आणि उठाव मिळण्याकरता आखलेले नवीन धोरण उपयुक्त ठरेल.साठवणी केंद्राच्या अभावी होणारे नुकसान टाळण्याचाही प्रयत्न आहे. लोकल उत्पादने खरेदीला प्राधान्य द्या, ग्रामीण, जिल्हा स्तरावर प्रक्रिया उद्योग उभारणी, मार्केटींगसाठी व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन लोकल उत्पादने ग्लोबल ठरतील, अशा सूचनाही त्यांनी केल्या.