अन्यथा कोरोना रोखणे होणार महाकठीण : विविध स्तरातून नागरिकांच्या प्रतिक्रिया
प्रतिनिधी / पणजी
राज्यात रोज 100 पेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडत आहेत आणि बळींची संख्याही दुहेरी अंकावर पोहोचलेली असतानाही सरकार लॉकडाऊन करत नसल्याबद्दल प्रचंड आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आणखी किती बळी गेल्यानंतर सरकार जागे होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. कोरोनाची ही सांखळी तोडण्यासाठी किमान 15 दिवस तरी लॉकडाऊन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढताच पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले. तेथील जनमताची कदर करत सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. परंतु गोव्यात मात्र नेमके उलटे घडत असल्याचे दिसून येत आहे.
आता कुठे गेले ’भिवपाची गरज ना’?
31 वर्षीय तरुण व 49 वर्षीय मध्यमवयीन व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाची दहशत वाढली असून लोकांना आपल्या कुटुंबाची काळजी वाटू लागली आहे. ’भिवपाची गरज ना’ हे वाक्य वारंवार सांगणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता मात्र ते वाक्य बोलायला तयार नाहीत.
राज्यात एकूण बाधितांची संख्या दोन हजार पार झाली असून निम्मे रुग्ण बरे झालेले असले तरीही त्यात तेवढय़ाच किंबहुना जास्त गतीने नव्यांचीही भर पडत आहे. हे चित्र भीतीदायक असून कोरोना नियंत्रणात येत नाही हे गेल्या काही दिवसांपासून समोर आले आहे.
सध्या कोरोना रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न किंवा उपाययोजना होत नाहीत हे देखील तेवढेच खरे आहे. त्यामुळे सरकारने आता आणखी बळींची वाट न पाहता लॉकडाऊनचा उपाय अमलात आणावा, अन्यथा पुढे कोरोनावर नियंत्रण ठेवणे महाकठीण होणार असेच चित्र दिसून येत आहे.