कृष्णात चौगले / कोल्हापूर
कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच पावसाळ्यात पसरणाऱया साथरोग नियंत्रणाचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागापुढे आव्हान आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 1 जून पासून आपत्कालिन कक्ष सुरु केला आहे. या कक्षामार्फत पूरपरिस्थितीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरीक, गरोदर माता, तिव्र व मध्यम कुपोषीत बालके व विकलांग रूग्णांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. संभाव्य साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून आवश्यक सर्व औषधे व लसी उपलब्ध केली आहेत. आपत्कालिन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून पूरग्रस्त भागामधील प्राथमिक आरोग्य केंद्रांशी समन्वय ठेवला जाणार आहे.
जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांच्या नियंत्रणाखाली आपत्कालीन कक्ष सुरु ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी व जिल्हा मुख्यालयातील 1 सुपरवायझर व 1 शिपाई असे दोन कर्मचारी तिन शिफ्टमध्ये 24 तास कार्यरत राहणार आहेत. 1 जून ते 2 ऑक्टोबर 2020 अखेर हा कक्ष कार्यरत राहणार आहे. तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक किंवा सेविका, बी.एन.ओ यांचा समावेश असून हा कक्ष 24 तास कार्यरत करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. आरोग्य सेवक, सेविका, सहाय्यक आरोग्य सेवक यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या असून त्यानुसार सनियंत्रण करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.
जिह्यातील एकूण 128 पुरग्रस्त गावे व 210 जोखीमग्रस्त गावातील सर्वांना आपत्कालिन काळात औषधोपचार करण्यासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. संभाव्य पूरग्रस्त गावांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांना पुरग्रस्त गावांसाठी आदेशीत करण्यात आले आहे. तसेच अद्यावत वाहने व औषधे आदींचा वैद्यकीय पथकात समावेश आहे. अशा पथकांची माहिती कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी, पदाधिकारी व संबंधित कार्यालयांना देण्यात आली आहे. प्रत्येक प्रा. आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर आवश्यक तो जलजन्य व किटकजन्य औषध साठा पुरेशा प्रमाणात पाठविण्यात आला असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साथरोग नियंत्रण किट अद्यावत करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तयार केलेल्या किटद्वारे 25 पेशंटवर उपचार करता येणार आहेत. तर उपकेंद्रांसाठी तयार केलेल्या किटद्वारे 5 पेशंटवर उपचार करता येणार आहेत. तसेच पूरस्थिती उद्भवल्यास जिह्यातील संपर्क तुटणाऱया प्रा. आ. केंद्रांतर्गत गावांसाठी दोन ठिकाणी अतिरिक्त औषधसाठा ठेवण्यात आल्याचेही डॉ. साळे यांनी सांगितले.
साथीच्या आजारातील रुग्णांवर केले जाणार त्वरीत उपचार
पूरग्रस्त, संभाव्य पूरग्रस्त, व संपर्क तुटणाऱया गावांना आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व वैद्यकीय अधिकाऱयांच्या मार्फत दैनंदिन भेट देऊन साथीच्या आजारातील रूग्णांवर त्वरीत उपचार केले जाणार आहेत. पुरग्रस्त गावांमध्ये आवश्यकतेनुसार फवारणी केली जाणार आहे. जिह्यातील एकूण 36 ठिकाणी 108 आपत्कालिन आरोग्य सेवा पथक सुसज्ज ठेवण्यात आले आहे. याशिवाय बाह्य जिह्यातील सांगली, बेळगाव, आदी आपत्कालिन यंत्रणेशी संपर्क ठेवून भौगोलिक परिस्थितीनुसार रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त पूरस्थितीमध्ये ग्रामीण भागातील नागरीकांना अडचण आल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडील दुरध्वनी क्रमांक 0231-2661653 तसेच प्रत्येक तालुका अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहनही डॉ.साळे यांनी केले.
3 हजार 928 कर्मचाऱयांवर आपत्कालिन वैद्यकीय सुविधेची जबाबदारी
पूरग्रस्त गावात आपत्कालिन वैद्यकीय सुविधेसाठी 3 हजार 928 अधिकारी व कर्मचाऱयांवर जबाबदारी दिली आहे. 74 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 413 उपकेंद्रांमध्ये 126 वैद्यकीय अधिकारी 143 आरोग्य सहाय्यक, 327 आरोग्य सेविका, 2776 आशा स्वयंसेविकांचा समावे आहे.
बांधकाम विभागाची आपत्कालिन यंत्रणा सज्ज
बांधकाम विभागाच्यावतीने 1 जून रोजी आपत्कालिन कक्ष सुरु केला आहे. यामध्ये जिल्हास्तरीय कक्षामध्ये 1 वरिष्ठ सहाय्यक , 1 स्थापत्य अभियंता व 1 परिचर चक्राकार पद्धतीने 24 तास कार्यरत राहणार आहेत. तर तालुकास्तरावर 1 शाखा अभियंता, 1 स्थापत्य अभियंता, व 1 शिपाई कार्यरत राहणार आहे. तालुकास्तरावरील माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे व संबंधित तालुक्याच्या महसूल विभागास दिली जाणार असल्याची माहिती जि.प.च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी.आर.कांडगावे यांनी दिली. जिह्यामध्ये विविध कारणांनी रस्त्यावरील वाहतूक खंडीत झाल्यास तसेच आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास तालुकास्तरावरील वेगवेगळ्या कंत्राटदारांना आपत्ती निवारणासाठी पाचारण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेकडील मनुष्यचलित 51 नावा कार्यरत आहेत.