वाहनांची वाहतूक बंद – उद्या सकाळी वाहतूक सुरू होण्याची शक्यता
प्रतिनिधी / वाकरे
कोल्हापूर – गगनबावडा राज्यरस्त्यावर दोनवडे फाट्यानजीक अद्याप महापुराचे फूटभर पाणी असून सोमवारी सायंकाळी पाण्यातून अंशतः पायी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र सोमवारी सायंकाळ ७ वाजेपर्यंत वाहनांची वाहतूक बंद होती. मंगळवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर -गगनबावडा राज्यरस्त्याला दोनवडे-बालिंगे नजीक सुमारे दहा फूट पाणी होते. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून सोमवार पर्यंत या मार्गावरील कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी आपत्कालीन विभागाची बोट कार्यरत होती. दुध पुरवठा बंद होता. वाहतूक बंद असल्याने जनतेची गैरसोय होत होती. या रस्त्यावरील पाणी पूर्ण उतरल्याशिवाय वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय करवीर पोलीस प्रशासनाने घेतला होता. पण सायंकाळी आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पायी वाहतूक सुरू केली असून रात्री उशिरा अथवा मंगळवारी सकाळी वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे.