कोल्हापूर / अहिल्या परकाळे
शिवाजी विद्यापीठात जवळपास दीड डझन अध्यासन केंद्रे आहेत. नियमानुसार अनेक अध्यासनांना युजीसीकडून मिळणारे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत ही अध्यासने होती. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र व संग्रहालय संकुल आणि यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशालेला 10 कोटी रूपये मंजूर केले आहेत. तसेच राज्यातील सर्व विद्यापीठात महापुरूषांच्या नावाने सुरू असलेल्या अध्यासनाला प्रत्येकी 3 कोटी रूपये देण्याचे जाहीर केले आहे. विद्यापीठ प्रशासनाने महापुरूषांच्या अध्यासनाचा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला तर सर्वच अध्यासनाला अच्छे दिन येणार आहेत.
अध्यासनाच्या मादयमातून संशोधन करण्यासाठी युजीसीकडून अनुदान दिले जाते. परंतू युजीसीचे अनुदान बंद झाल्यानंतर संबंधीत अध्यासनाला राज्य सरकारने अनुदान दिले पाहिजे, हा नियम आहे. शिवाजी विद्यापीठ गेल्या कित्येक वर्षापासून अध्यासनांना अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्नशील होते. सातत्याच्या पाठपुराव्यामुळे विद्यापीठातील दोन अध्यासनांना 10 कोटी मंजूर केले आहेत. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर, पंडीत नेहरू, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज मराठा, संत तुकाराम, अहिल्यादेवी होळकर, विठ्ठल रामजी शिंदे, लोकनेते बाळासहेब देसाई, कॉम्रेड दत्ता देशमुख, आण्णाभाऊ साठे, शारदाबाई पवार अध्यासनांसह अन्य अध्यासनांचा प्रस्ताव विद्यापीठाने राज्य शासनाकडे तातडीने पाठवून पाठपुरावा करण्याची गरज आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सर्वच अध्यासनांचे कामकाज विद्यापीठ स्वनिधितून सुरू आहे. सरकारकडून अनुदान मिळाले तर या अध्यासनाचा मुख्य उद्देश साध्य करणे सहज सोपे होईल. तसेच महापुरूषांच्या जीवनाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासही आर्थिक अडचण भासणार नाही. तसेच विद्यापीठाच्या स्वनिधितून होणारा आर्थिक भारही कमी होईल, असे तज्ञांचे मत आहे.
बहुतांश अध्यासनांचा खर्च स्वनिधितून
शिवाजी विद्यापीठातील सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राचे अनुदान मध्यंतरी दहा वर्षे मिळालेले नव्हते. सध्या या केंद्राला युजीसीने दोन कोटीचे अनुदान दिले आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे, परंतू गेल्या कित्येक वर्षापासून सर्व अध्यासनाचा खर्च विद्यापीठ स्वनिधीतून केला जातो. परंतू याला शासनाच्या अनुदानाची जोड मिळाली तर संशोधनाला चालना मिळेल.
महापुरूषांच्या अध्यासनाचे प्रस्ताव पाठवले तर आणखी 30 कोटी मिळतील
सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठातील थोर समाजसुधारक, महनीय व्यक्तींच्या नावे अध्यासन केंद्र स्थापन करण्याचे धोरण निश्चित झाले आहे. अशा प्रत्येक केंद्रासाठी 3 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या सूचनांप्रमाणे विद्यापीठातील महापुरूषांच्या अध्यासनांचे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला तर जवळपास आणखी 30 कोटी रूपये विद्यापीठाला मिळतील.
अध्यासनांना निधी मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने यापुर्वीच काही अध्यासनाचे प्रस्ताव राज्यशासनाला पाठवले आहेत. आता शासनाच्या सूचनेनुसार उर्वरीत अध्यासनांचे प्रस्ताव लवकरात लवकर शासनाला पाठवून पाठपुरावा केला जाईल. विद्यापीठातील अध्यासनांना जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे.- कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे (शिवाजी विद्यापीठ)
या अध्यासनामुळे संशोधनाची संधी
छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू, पंडीत नेहरू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, विठ्ठल रामजी शिंदे, गोडबोले, भगवान महावीर, संत तुकाराम, शारदाबाई पवार, छत्रपती शाहू महाराज मराठा,अहिल्यादेवी होळकर,लोकनेते बाळासहेब देसाई, कॉम्रेड दत्ता देशमुख, आण्णाभाऊ साठे, स्त्री अभ्यास केंद्र, सामाजिक वंचितता व समावेशक धोरण यासह अन्य अध्यासनांमध्ये संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांन मिळत असते. यातून या लोकनेत्यांचा सर्वांगाने अभ्यास केला जातो.