रविवार असूनदेखील बाजारपेठेत शुकशुकाट, बससेवा विस्कळीत : रस्ते पडले ओस, व्यावसायिकांतून नाराजी
प्रतिनिधी /खानापूर
कर्नाटक राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार दोन दिवस विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. या विकेंड लॉकडाऊनला खानापूर तालुक्यात दोन्ही दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. केवळ ठराविक दुकाने उघडी ठेवण्यास प्रशासनाने मंजुरी दिली होती. यामुळे एरव्ही हाऊसफुल असलेला खानापूरचा स्टेशन रोड, बाजारपेठ परिसरात शुकशुकाट पसरलेला होता. एरव्ही दर शनिवारी खानापुरातील बरीच दुकाने बंदच असतात. तरीदेखील मुख्य रस्त्यावर वाहनांची तसेच जनतेची वर्दळ बरीच असते. पण विकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी देखील शहरातील रस्ते ओस पडले होते. तर रविवारी खानापूरचा आठवडी बाजार असतो. पण विकेंड लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार असूनदेखील सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता. शहरातील केवळ किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, भाजीपाला, फळफळावळांची दुकाने उघडी होती. पण गिऱहाईकांची कमतरता होती. यामुळे प्रत्येक दुकानदार गिऱहाईकांच्या प्रतीक्षेत बसले होते. हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सलची मुभा देण्यात आली होती. यामुळे ठराविक हॉटेल्स उघडी होती. या विकेंड लॉकडाऊनमध्ये कापड दुकाने, गोल्डस्मिथ, सलून, स्टेशनरी तसेच भांडय़ांची दुकानेही बंद ठेवण्याचा प्रशासनाने आदेश दिला होता. यामुळे ती सर्व दुकाने बंदच होती. मात्र प्रशासनाच्या या निर्णयावर शहर तसेच तालुक्यातील कापड व्यापारी, गोल्डस्मिथ, सलून व्यावसायिक, स्टेशनरी, ब्युटी पार्लर, भांडे व्यावसायिकानी मात्र प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या बाबतीत प्रशासनाकडून केवळ आमच्यासारख्या व्यावसायिकांवर अन्याय का? जर विकेंड लॉकडाऊन करायचाच असेल तर केवळ डॉक्टर, औषधे दुकाने तसेच दूध विक्री वगळून इतर सर्वच व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असता तर कुणावरही अन्याय होण्याचा प्रश्न नव्हता, अशी प्रतिक्रिया त्या व्यावसायिकांनी व्यक्त केली.
गेल्यावर्षी घोषित झालेल्या विकेंड लॉकडाऊनमध्ये बससेवाही पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. पण यावर्षी नियमावलीतून बससेवांना वगळण्यात आल्याने खानापूर आगारातून विविध मार्गावरील बससेवा नेहमीप्रमाणे सुरुच होता. मात्र प्रवाशांनी बससेवेला अत्यल्प प्रतिसाद दिला. यामुळे बस खालीच होत्या. ग्रामीण जनतेने गेल्या दोन दिवसात विकेंड लॉकडाऊनमुळे शहराकडे पाठ फिरविली होती. यामुळे खासगी प्रवासी वाहनचालकांनी देखील दोन्ही दिवस आपली वाहने बंद ठेवली होती.
ग्रामीण भागातही विकेंड लॉकडाऊन यशस्वी
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातही विकेंड लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी झाला. खानापूर शहराबरोबरच तालुक्यातील नंदगड, लोंढा, बिडी, पारिश्वाड, जांबोटी, इटगी आदी मोठय़ा गावातही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ग्रामीण जनतेने घरात न राहता या दोन दिवसात शेती कामांवर अधिक जोर दिला. विकेंड लॉकडाऊनमुळे ग्रामीण जनतेने गावात होणारे अनेक कार्यक्रम रद्द केले. रविवारी लग्नाचाही मुहूर्त होता. पण लग्नाकडेही जनतेने पाठ फिरविली. यामुळे मोजक्याच जणांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील लग्न सोहाळे पार पडले. खानापूर तालुक्यातून जाणाऱया बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाबरोबरच खानापूर-अळणावर, खानापूर-रामनगर, खानापूर-जांबोटी, पिरनवाडी-जांबोटी, कणकुंबी-चोर्ला तसेच इतर मार्गावरील वाहनांच्या वर्दळीवर विकेंड लॉकडाऊनचा परिणाम झाल्याने एरव्ही वाहनांनी हाऊसफुल्ल असणारे रस्तेही मोकळे दिसत होते.