प्रतिनिधी / आटपाडी
अनेक नैसर्गिक संकटे असतानाही दुष्काळी भागातील लोकांनी सन्मानाने जगण्याचा मार्ग शोधला आहे. देशातील पहिली सर्कस, देशभरात गालाइ व्यवसायाच्या निमित्ताने विस्तार, गोदी कामगार, डाळिंब उत्पादक असे अनेक प्रयोग करत लौकिक प्राप्त केला आहे. डाळींबाचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर आता देश आणि जागतिक पातळीवर मार्केटिंगवर भर द्या, असा सल्ला खासदार शरद पवार यांनी दिला. आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी येथील प्रयोगशील डाळिंब बागांची पाहणी खासदार शरद पवार यांनी केली. याप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, अमरसिंह देशमुख, सदाशिवराव पाटील, दीपक साळुंखे , अरुण लाड, तानाजी पाटील, भारत पाटील , आनंदराव पाटील , रावसाहेब पाटील , हनमंतराव देशमुख, सुशांत देवकर, बाळासाहेब पाटील, अविनाश पाटील यांच्यासह सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. खांजोडवाडी गावातील शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयोगाचे खासदार शरद पवार यांनी कौतुक करत परदेशातही आपल्याकडील दर्जेदार फळे महत्त्वाचे स्थान पटकाविले याचे पाहून आनंद होत असल्याचे सांगितले.