कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे गतवर्षी गणेशोत्सवाला गावी येता न आलेले चाकरमानी यावर्षी मोठय़ा संख्येने कोकणात येत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात पाच लाखाहून जास्त गणेशभक्त येण्याची शक्यता आहे. या गणेशभक्तांना जरूर येऊद्यात, परंतु एवढय़ा मोठय़ा संख्येने चाकरमानी येत असताना कोरोनाच्या तिसऱया लाटेला आमंत्रण मिळू नये याचीपण काळजी घेऊद्यात..!
यावर्षीचा गणेशोत्सव 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. हा गणेशोत्सव साजरा करताना कोकणातील लोक हे सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करतात. त्यासाठी कामानिमित्त मुंबईसह विविध शहरामध्ये असणारे चाकरमानी गणेशोत्सवाला आवर्जुन येतात. देश-विदेशातूनही अनेकजण आपल्या गावी येत असतात. गतवर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे कमी प्रमाणात चाकरमानी आले होते. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असल्याने मोठय़ा संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी येण्याची शक्यता आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवाला कोकणात येणाऱया चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या आहेत. या सर्व रेल्वेंचे बुकिंग फुल्ल झाले आहे. जादा एसटी बसही सोडण्यात आल्या असून 1700 एसटीबसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. खाजगी बसेस व इतर खाजगी वाहनांचेही बुकिंग झाले आहे. त्यामुळे जवळपास पाच लाखाहून जास्त चाकरमानी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ात येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने चाकरमानी येत असताना कोरोनाचे सावट अजूनही दूर झालेले नाही. त्यामुळे चाकरमान्यांनी स्वतःची आणि दुसऱयाच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यायला हवी. मार्च 2020 मध्ये कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर कोरोनाचे संक्रमण वाढत गेले. कोकणातही कोरोनाचा हळूहळू प्रभाव वाढत जावून ऐन गणेशोत्सवाच्या काळातच ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात कोरोनाची पहिली लाट राज्यात उसळली होती. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे कोरोनाला रोखण्यासाठी गतवर्षी कोकणात येणाऱया चाकरमान्यांना निर्बंध घातले गेले होते. 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असल्यामुळे 14 दिवस अगोदरच चाकरमान्यांनी यावे किंवा 72 तास अगोदर कोरोना टेस्ट करुन यावे असे निर्बंध घातले होते. त्यामुळे बहुतांशी चाकरमान्यांनी गणेशोत्सवाला येणे टाळले होते. दरवर्षी मोठय़ा संख्येने येणारे चाकरमानी गतवर्षी कमी प्रमाणात आले होते. त्यानंतर कोरोनाकाळात वर्षभरातही चाकरमान्यांचे येणे कमी झाले होते.
यावर्षी गणेशोत्सवापूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आलेला आहे. एप्रिल ते जुलै 2021 या चार महिन्यात उसळलेली कोरोनाची दुसरी लाटसुद्धा ओसरली आहे. त्यामुळे गणेशभक्त मोठय़ा संख्येने आपल्या गावी येण्यास इच्छूक आहेत. कोकणात पारंपरिक पद्धतीने घराघरात गणेशोत्सव साजरा केला जातो. अकरा दिवसापर्यंत गणेशोत्सवाची धामधूम सुरु असते. त्यामुळे गतवर्षी गणेशोत्सवाला येता न आल्याने हिरमोड झालेल्या गणेशभक्तांना यावर्षीच्या गणेशोत्सवाला येवू देत, परंतु कोरोनाची नियमावली मात्र त्यांनी पाळावी एवढंच.तरच गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडून कोरोनाला दूर ठेवता येईल.
गतवर्षीचा अनुभव पाहता गणेशोत्सवापूर्वी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत होते. प्रशासनाने कोकणात येणाऱया चाकरमान्यांना निर्बंध घातले होते. चाकरमानी एक वर्ष गावी नाही आले तर बरे होईल, अशीच सर्वांची धारणा होती. त्यामुळे चाकरमानी नाराजही झाले होते, परंतु गतवर्षी जिल्हय़ाबाहेरुन आलेल्या लोकांमुळे ऐन गणेशोत्सवात कोरोनाचे संक्रमण वाढले होते हे विसरुन चालणार नाही. कोरोनाच्या दुसऱया लाटेचेही तेच झाले. मुंबईसह राज्यातील इतर जिल्हय़ात कोरोनाची दुसरी लाट आली.त्यावेळी कोकणात लाट आली नव्हती, परंतु मार्च महिन्यातील शिमगोत्सवाला गावी आलेल्या लोकांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत गेला व एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट कोकणात सुरु झाली. आता कुठे ती ओसरली आहे.
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता नीती आयोगाने वर्तवली आहे व सतर्क राहण्याचा सल्ला केंद्र शासनाला दिला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांनी जरुर यावे, परंतु कोरोनाच्या तिसऱया लाटेचे निमंत्रण घेऊन येऊ नये, हीच अपेक्षा असून त्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवासाठी येणाऱया प्रत्येक चाकरमान्यांची कोरोना टेस्ट करण्याचे नियोजन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु पाच लाखाहून जास्त संख्येने येणाऱया प्रत्येक चाकरमान्यांची कोरोना टेस्ट करणे प्रशासनाला अवघड जाणार आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येवून आरोग्य यंत्रणा कोलमडू शकते. अशावेळी चाकरमान्यांनी गावी येतानाच कोरोना टेस्ट करुन कोकणात प्रवेश केला तर आरोग्य यंत्रणेचे काम सोपे होईल, गर्दी टाळता येईल. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाची टेस्ट करायला लावण्याची सक्ती करू नये, अशी मागणी होत आहे. ही मागणी योग्य असली तरी लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर कोरोना होत नाही असे काही नाही. कोरोना लस घेतलेल्यांनाही कोरोना होवू शकतो. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्यांनीही टेस्ट केली तर ते स्वतःसाठी आणि दुसऱयासाठी निश्चितच फायद्याचे ठरेल. गणेशोत्सवाला विक्रमी संख्येने यावर्षी चाकरमानी येणार असल्याने आरोग्य व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण वाढेल. चाकरमान्यांनी जरुर यावे. परंतु तिसऱया लाटेला निमंत्रण मिळू नये याची काळजी घ्यावी.
तिसऱया लाटेचा लहान मुलांना धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा दिला गेलेला आहे. ही तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊ शकते, असेही म्हटले आहे. त्यामुळे सप्टेंबरमधील गणेशोत्सव संपल्यावर लगेचच गणेशोत्सव आनंदाने साजरा करताना आपली पारंपरिकता जपली पाहिजे. गणेशोत्सवातील मिरवणुका, समारंभ, बाजारपेठांमधून होणारी गर्दी टाळली पाहिजे. तरच तिसऱया लाटेचे निमंत्रण टाळता येऊ शकेल.
संदीप गावडे