सरपंच असणार ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष
प्रतिनिधी / कणकवली:
गावातील शेतीच्या सर्वांगिण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीत जास्त विनियोग करणे, विविध योजना, प्रकल्प यासाठी कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या अनुषंगाने आता गाव पातळीवर प्रत्येक ग्रा. पं. मध्ये ग्राम कृषीविकास समिती स्थापन करण्यात येणार आहे. सरपंच हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत.
या समितीचे पदसिद्ध सदस्य हे उपसरपंच असणार आहेत. तर सदस्य म्हणून ग्रा. पं. सदस्य, तीन प्रगतशील शेतकरी यापैकी एक महिला, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी गट यांचे प्रतिनिधी, महिला बचत गट प्रतिनिधी, दोन कृषीपुरक व्यावसायीक शेतकरी, तलाठी, सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी तसेच सहसचिव म्हणून कृषी सहाय्यक काम पाहणार आहेत.
समितीच्या माध्यमातून ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या समन्वयाने समितीच्या बैठकीचे आयोजन प्रत्येक महिन्यातून किमान एकदा करण्यात येणार आहे. कृषी विषयक योजना ग्रा. पं. क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रचार, प्रसार करणे, योजनांचा आढावा घेऊन लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. स्थानिक स्तरावर हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आदी बाबी लक्षात घेऊन विविध पीक लागवडीबाबत नियोजन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी दर्जेदार पीक उत्पादन कसे घेता येईल याबाबत समिती काम करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा, एकात्मिक कीड नियंत्रण, पोषण व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, संरक्षित शेती, फळबाग लागवडीबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. शेतीपूरक व्यवसाय दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड, शेतीपुरक व्यवसाय याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पीक काढणी तंत्रज्ञान व विक्रीसाठी बाजारपेठा याबाबत मार्गदर्शन करणे, शेतीसाठी होणारा कर्जपुरवठा याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.