प्रतिनिधी /काणकोण
गावडोंगरी येथील श्री मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासनाधिश्वर देवालयाच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या अंतर्गत शिर्षारान्नी उत्सव मोठय़ा उत्साहात झाला. हा उत्सव दर दोन वर्षांनी होतो. या उत्सवाच्या निमित्ताने देवालयात झालेल्या विविध धार्मिक कार्यांत हजारो भाविकांनी भाग घेतला. या देवस्थानचे भाविक, कुळावी गोव्याच्या विविध भागांबरोबरच शेजारच्या कर्नाटक राज्यात विखुरले असून दरवर्षी या जत्रोत्सवात भाग घेण्यासाठी भाविक गर्दी करत असतात.
सकाळी दिवजांच्या भोवरीमध्ये देखील शेकडो सुवासिनींनी भाग घेतला. या जत्रोत्सवात भरणारी फेरी ही काणकोण तालुक्यातील अन्य जत्रोत्सवांच्या मानाने मोठी असते. विविध भागांतील विक्रेते या फेरीत सहभागी होत असतात. संध्याकाळी शिर्षारान्नी उत्सव देखील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावून अनुभवला. याअंतर्गत आंघोळ घातल्यानंतर नवीन वस्त्रे परिधान केलेल्या तीन गडय़ांना जमिनीवर झोपवले जाते. त्यांची डोकी केळीच्या पात्याने आच्छादली जातात. या मानवी चुलीवर शिशाच्या लाकडाने विस्तव केला जातो आणि मातीच्या भांडय़ात भात शिजविला जातो.
त्यापूर्वी प्रत्येक गडय़ाला सुईने टोचले जाते. त्यानंतर तलवारीने भगताच्या डोक्यावर वार करून त्या रक्ताने भात कालविला जातो आणि तो समोर शिंपडला जातो. यावेळी समोर देवस्थानची सर्व तरंगे उभी ठेवली जातात. अवघ्या अर्ध्या तासात हा उत्सव आटोपला जात असला, तरी हा पारंपरिक उत्सव पाहण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहत असतात. आज 22 रोजी कौल-प्रसादाने या वार्षिक उत्सवाची सांगता होणार आहे.