नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मार्च महिन्याच्या प्रारंभीच देशांतर्गत एलपीजी गॅस प्रतिसिलिंडर 25 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा दणका बसला आहे. सुधारित दरांनुसार आता ग्राहकांना एका गॅससाठी 819 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत एलपीजी गॅसच्या किंमतीत तीनवेळा वाढ झाल्याने सिलिंडर 100 रुपयांनी महागला होता. एकंदर मागील 26 दिवसांत एलपीजी 125 रुपयांनी महागला आहे.
गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. तसेच गॅसचे भावही वाढले आहेत. दर महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो. त्यानंतर किंमती निश्चित केल्या जातात. आयओसीने फेब्रुवारी महिन्यात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीनवेळा वाढ केली. प्रथम 4 फेब्रुवारीला 25 रुपये, दुसऱयांदा 15 फेब्रुवारीला 50 रुपये आणि तिसऱयांदा 25 फेब्रुवारीला किंमत 25 रुपयांनी वाढविण्यात आली. त्यानंतर केवळ चारच दिवसांनी म्हणजे मार्च महिन्याच्या प्रारंभी एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे.
दिल्लीत अनुदानित एलपीजी सिलिंडर आता 25 रुपयांनी महाग झाला असून तो 819 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी ते 794 रुपये होता. त्याचप्रमाणे मुंबईतही एलपीजी सिलिंडरसाठी 819 रुपये द्यावे लागतील. एलपीजी सिलिंडरसाठी कोलकाताला जास्तीत जास्त 845.50 रुपये द्यावे लागतील, चेन्नईमध्ये ग्राहकांना एलपीजी सिलिंडरसाठी 835 रुपये मोजावे लागत आहेत.
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
एलपीजी सिलिंडर आणि इंधन दरवाढीचा परिणाम इतर वस्तूंच्या महागाईवरही झालेला दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीचे चटके सहन केले जात असतानाच आता भाजीपाला, कडधान्ये, खाद्यतेल, दूध आदी वस्तूही महाग होऊ लागल्या आहेत. या सर्वांच्या परिणामांमुळे लोकांचे बजेट कोलमडत असल्याचे चित्र दिसत आहे.
सोने-चांदी दरात पुन्हा वधार
गेल्या आठवडय़ात सोन्याच्या दरात बरीच घट झाल्यानंतर आता खरेदी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारातही सोमवारी सोन्याचे दर वाढले. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा दर 241 रुपयांनी वाढून 45 हजार 520 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर दिल्लीत चांदीचा दर 781 रुपयांनी वाढून 68 हजार 877 रुपये प्रतिकिलो झाला. मुंबईत सोन्याचा दर 45 हजार 940 तर चांदीचा दर प्रतिकिलो 67 हजार 510 रुपयांवर पोहोचला आहे.
व्यवसाय बंद करा, चूल फुका ! खोटी आश्वासने ऐकून पोट भरा !
राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ झाल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय ः व्यवसाय बंद करा, चूल फुका! खोटी आश्वासने ऐकून पोट भरा!’’ असे ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी याअगोदर इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आयना दिखाते हैं!’’ असे म्हणत राहुल गांधींनी या ट्विटमध्ये केंद्रातील भाजपप्रणित सरकारवर टीका केली होती.
……………