प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील गोकर्ण येथे अरबी समुद्रात बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. दोघांना वाचविण्यात यश आले. सुमा सिद्धराजू (वय 21) तिप्पेश नाईक (वय 20) व रवी (वय 35) अशी मृतांची नावे आहेत.
कोल्लेमाल तालुक्यातील हेब्बळगोडी तिरुपालय येथील गारमेट फॅक्टरीमधील 15 कर्मचारी देवदर्शनासाठी गोकर्ण येथे गेले होते. जेवणानंतर ते समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी अरबी समुद्रात उतरले. समुद्र स्नानाचा आनंद लुटताना लाटेच्या विळख्यात सापडून तिप्पेश खोल समुद्रात खेचला गेला. हे लक्षात येताच सुमा तिप्पेशच्या मदतीला धाऊन गेली.
तथापि, तिप्पेश आणि सुमा हे दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. मात्र, तिप्पेश आणि सुमाच्या मदतीला धाऊन गेलेला रवीही अडचणीत आला. तिघांना वाचविण्यासाठी रत्नम्मा आणि पवित्रा सरसावले. तथापि तेही गटांगळ्या खाऊ लागले. मात्र रत्नम्मा आणि पवित्रा यांना मच्छीमारी बांधवांनी वाचविले. पण सुमा, तिप्पेश आणि रवी यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच गोकर्ण पोलीस घटनास्थळी धाऊन गेले.
रत्नम्मा आणि पवित्रा यांच्यावर उपचार करण्यात आले. गोकर्ण पोलीस अधिक तपास करीत आहेत.