महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाऱया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र! नवरात्रात घटस्थापना करतात. घटरुपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणाऱया नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून आज 14 ऑक्टोबर रोजी सांगता होईल. यानिमित्त गोवा राज्यातील पेडणेपासून काणकोणपर्यंत विविध मंदिरे व नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या दसरोत्सव साजरा होणार आहे. गोव्यात अनोख्या पद्धतीने दसरोत्सव साजरा होतो. गोवा राज्याला अनेक देव-देवतांच्या मंदिरांचे वैभव लाभलेले असून घटस्थापनेनंतर या मंदिरांमध्ये नवरात्रीची लगबग दिसली आहे. प्रत्येक दिवशी घटाला वेगवेगळय़ा फुलांच्या माळा घालण्याची प्रथा अजूनही अबाधित आहे. गोव्यातील मंदिरांमध्ये साजऱया होणाऱया नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘मखर’ हे असते.
गोव्यात सध्या दुर्गा पूजनचा कार्यक्रमही सुरू आहे. येथील भाविकांना गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दसरा-दिवाळीचे. नवरात्र सोहळय़ातला दसरा (विजयादशमी) हा महत्त्वाचा दिवस. दसरा हा सर्वांच्याच उत्साहाचा, आनंदाचा दिवस. सारे वातावरण प्रसन्न आणि मंगलमय झालेले असते. या दिवशी खऱया अर्थाने भाविक आनंदोत्सव साजरा करतात. ‘सायंकाळी सोने लुटूनी, मोरू परतुनी आला, बहीण काशी दारी येऊनी ओवाळी मग त्याला, दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ या काव्यपंक्ती या दिवशी आठवतात. दसऱयाला सोने (आपटय़ांची पाने) लुटून आणण्याची खास प्रथा असते. याचदिवशी एका वर्षाच्या अज्ञातवासानंतर अर्जुनाने शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवलेली आपली शस्त्रे पुन्हा हाती घेऊन कौरवसेनेचा धुव्वा उडविला होता. ही महाभारतातील कथा आणि मराठे सरदार दसऱयाच्या शुभमुहुर्तावर पुन्हा मुलुखगिरी करायला निघत असत, असा मोहक प्रथेचा संगम आहे.
पेडणे तालुक्यातील पालये गावातही दसरोत्सव अभिनव पद्धतीने साजरा होतो. महानवमीदिनी म्हणजेच विजयादशमीच्या आदल्या दिवशी देवाला नेसविण्याची कापडे परिट (रजक) बांधवांकडून वाजत-गाजत श्री भूमिका वेताळ मंदिरात आणण्यात येतात. नववधूच्या वडिलांकडून देवाच्या तरंगांना नेसविण्यासाठी साडय़ा दिल्या जातात. श्री भूतनाथ, श्री रवळनाथ मूर्तीचे शुद्धीकरण करण्याचा मान येथील सुवर्णकारागिराला प्राप्त होतो.
विजयादशमी दिवशी सजविलेली तरंगे बाराच्या फाटीवर आणली जातात. त्यावेळी परिट कोंबडय़ाचा बळी देतो तसेच नाभिक रजक पायाला वस्तरा लावून थोडे रक्त काढतो. ते रक्त भातामध्ये घालून परिट ते भक्षण करतो, अशी प्रथा आहे. तद्नंतर तरंगे बाराच्या चव्हाटय़ावर नेली जातात. तेथे विधीपूर्वक लग्न लावण्यात येते. त्यानंतर एक हरिजन बांधव कोहळा रजकाच्या पोटावर ठेवतो. अवसारी पुरुष तो कोहळा कापतो अथवा तो तरंगाच्या साहाय्याने ढकलला जातो. प्राचीन काळी सगळीकडे बळीची प्रथा होती. आता कालमानाप्रमाणे सर्व पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात बळीच्याऐवजी ‘कोहळा’ बळी म्हणून दिला जातो. तद्नंतर सर्व लोक सोने लुटण्याच्या समारंभात भाग घेतात. आपटय़ाची पाने बहुगुणी असल्याने कदाचित त्यांना ‘सोने’ म्हणून संबोधले असावे.
तद्नंतर मानकऱयांच्या वाडय़ावर देवाच्या तरंगांचे पूजन केले जाते व ‘पावणेर’ हा महाप्रसादाचा कार्यक्रम थाटात साजरा होतो. कोजागिरी पौर्णिमेदिवशी तरंगे मंदिरात आणली जातात व दुसऱया दिवशी कौल दिला जातो. असा हा दसरोत्सव मंगलमय वातावरण मागे ठेवून साजरा होतो. गोव्यातील प्रसिद्ध दैवत श्रीस्थळ – काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन (मलकाजाण) देवस्थानाताही दसरा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या गोमंतकात विविध भागात होणाऱया उत्सवांमुळे त्या भागाची व त्या तालुक्याची ओळख होते. जागतिक स्तरावर पेडणे तालुक्याचीही ओळख निसर्गसंपन्न तालुका म्हणून आहे. पेडणे येथे साजरा होणारा सुप्रसिद्ध दसरोत्सव व त्याचाच भाग असलेली कोजागिरी पौर्णिमेला साजरी होणारी ‘पुनव’ प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून या पुनवेचा महिमा खूप मोठा आहे. शेजारील महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकही या पुनवेला आवर्जून उपस्थिती दर्शवितात. गोव्यात प्राचीन देवालयांपैकी पेडणे येथे असलेले श्री भगवती मंदिर व देव रवळनाथ मंदिरात दसरोत्सव मोठय़ा भक्तिभावाने अनेक वर्षे साजरा होत आहे. उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे, असे जाणकार सांगतात.
गोमंतकीय संस्कृतीच्या रक्षणार्थ उभारण्यात आलेल्या कुंडई येथील श्री क्षेत्र तपोभूमीवरही नवरात्र सोहळय़ात प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम सुरू आहेत. कन्या पूजनाचे महत्त्व सांगितले आहे. या काळात सध्या विविध विद्यालयांमध्ये शारदोत्सव अर्थात सरस्वती पूजनाचे कार्यक्रमही सुरू आहेत. शारदोत्सवात विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल आहे. काही-काही विद्यालयांचे शारदोत्सव गावातील उत्सवाचा भाग बनलेले आहेत. विद्यालयांऐवजी स्थानिक नागरिकच सरस्वतीपूजनाचे कार्यक्रम साजरे करतात. यामुळेही राज्यात चैतन्यमय वातावरण निर्माण झालेले आहे. भजन, कीर्तनादी कार्यक्रम सुरू आहेत. कोरोनाचे सावट असतानाही यंदा भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. राज्यातील काही गावांमध्ये गरबा-दांडियाचा उत्साहही वाढू लागला आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे उत्सवाच्या आनंदाला मुकावे लागले मात्र यंदा कोरोनापासून थोडासा दिलासा लाभल्याने युवक-युवतींमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे.
आज एकंदर विद्यमान परिस्थितीवर नजर टाकल्यास विविध कारणांमुळे गोव्यातील शांतता हरवत चालल्याचे दिसून येते. अशाप्रकारच्या सण-उत्सवांद्वारे गोमंतकीय मानसिकता निश्चितच रुळावर येऊ शकते. गोव्यातील सण-उत्सवांची संजीवनी जपण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयाने आपल्यापरीने खारीचा वाटा उचलणे व संस्कृती रक्षणार्थ कटिबद्ध होणे काळाजी गरज ठरते.
राजेश परब