काही नतद्रष्ट लोक कोरोना संकट काळातही आपली पोळी भाजून घेत आहेत. काहीजण आपला अहंकार फणा काढून दाखवत आहेत तर काहीजण कोरोनाच्या निमित्ताने चक्क अस्पृश्यता पसरवू लागलेले आहेत आणि गोव्यातील माणुसकीला काळिमा फासत आहेत.
कोरोना महामारीमुळे सर्वांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक फार मोठे नुकसान होत आहे. कोरोनाने साऱया गोव्याला हैराण करून सोडलेले असताना, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागलेले असताना, अनेकांच्या घरचा आधार असलेल्या व्यक्तींचे बळी जात असताना, घरातील आई-वडिलांचे बळी जात असताना आणि सारेजण कोरोनाशी लढत असतानाच काही नतद्रष्ट लोक मात्र या संकटकाळातही आपली पोळी भाजून घेत आहेत. काहीजण आपला अहंकाराचा फणा काढून दाखवत आहेत तर काहीजण कोरोनाच्या निमित्ताने चक्क अस्पृश्यता पसरवू लागलेले आहेत. कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून आवश्यकता असलेली दोन मीटरच्या अंतराचा काहीनी गैरअर्थ काढून त्याला ‘सामाजिक बहिष्कार’ मध्ये परावर्तीत केले आहे. एका गावामध्ये कोरोनाबाधित सापडला तर त्या गावातील सर्वच लोकांना दुसऱया गावांमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली जाते. ही बंदी सरकारी नव्हे तर गावातील दीडशहाण्या, नतद्रष्ट्र लोकांचा दहशतवादच आहे तो. गोव्याच्या समाजामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली ही अस्पृश्यता लांच्छनास्पद आहे. त्याहून लांच्छनास्पद बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांवर आपल्या गावात अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्याची. असे करणाऱया लोकांना ही पापे स्वर्गात नव्हे जिवंतपणी येथेच फेडावी लागतील, तेव्हा त्यांना कळणार माणुसकी काय चीज आहे.
कोरोना महाघातक विषाणू असला तरी बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरारातील विषाणू जिवंत राहत नाही, हे आरोग्य विज्ञान सिद्ध आहे. मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याअगोदर त्याचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येते. प्लास्टिकच्या वेष्टनात घालून मृतदेह सुपूर्द केला जातो. पुढील प्रक्रिया कशी करावी, कोणी करावी, किती माणसे असावीत, सावधगिरी कशी बाळगावी हे सर्व समजावून दिल्यानंतर ते त्याप्रमाणे घडते आहे की नाही, हे पाहण्यासाठी सरकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची टीम असते. एवढी सारी प्रक्रिया होऊन मृतदेहावर हिंदू पद्धतीने म्हणजे चिताअग्नि देऊन अंत्यसंस्कार झाल्यानंतर कसल्याच प्रकारच्या विषाणूचा प्रसार होण्याची कोणतीच शक्यता नाही. हे सारे गोव्यातील सुप्रसिद्ध फॉरेन्सिक तज्ञ डॉ. मधु घोडकिरेकर यांनी फोंडा पालिकेच्या एका खास बैठकीत तीन महिन्यांपूर्वीच अत्यंत चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितले आहे. तरीही समाजाचे प्रबोधन झाले नाही, असे समजायचे काय?
अंत्यसंस्कारास विरोध किती दुर्दैवी
कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरच्या प्रक्रियेबाबत सरकारने जागृती करायला हवी होती, पण ती न करता सरकार संगीताच्या कार्यक्रमातून कोरोना म्हणजे काय हे अजूनही सांगतच बसले आहे. जागृती करण्याची आता वेळ राहिली आहे काय? ‘भिवपाची गरज ना’ सांगणाऱयांवर आता ‘भिवपाची गरज आसा’ सांगण्याची वेळ आली आहे. वाढत्या फैलावाबाबत लोकांवर खापर फोडून झाले, आता पुढे काय?कोरोनाबाधितांना इस्पितळांमध्ये चांगले उपचार मिळत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरीही बळी जाण्याची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे आणि दुसऱया बाजूने गावागावात कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करण्यास होणारा विरोध किती दुर्दैवी आहे?
गोव्यात जिथून फैलाव सुरू झाला त्याच वास्कोत कोरोनाचे बळी जाण्यासही प्रथम सुरुवात झाली. कोरोनाच्या बळींवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध होण्यालाही वास्कोतूनच प्रारंभ झाला. आता विरोधाचे हे लोण अनेक गावांमध्ये पोहोचले असून काही ठिकाणच्या बातम्या येतात, काही ठिकाणी येत नाहीत. मयताचे नातेवाईक हे सगळे सहन करून जो कोणी मिळेल त्याच्या मदतीने दुसऱया ठिकाणी नेऊन अंत्यसंस्कार करत असल्याचे दारुण चित्र ज्याच्या डोळय़ांसमोर येईल, त्यांनाच हे दुःख काय, या यातना काय हे कळेल. मृतदेहावरून होणारी अस्पृश्यता गोव्यातील माणुसकीला काळिमा फासत आहे. गावातील दीडशहाण्या, नतद्रष्टांमुळे अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शनही घेऊ शकत नाही. कोरोनामुळे अंत्यसंस्काराला पूर्वीसारखी माणसे मिळणे कठीण झाले आहे, तरीही ते कुटुंब जमेल तसे अंत्यसंस्काराची तयारी करते तर गावातील नतद्रष्ट अंत्यसंस्कारास विरोध करतात. अशा कुटुंबांनी आता लक्षात घ्यायला हवे आपला कोण, परका कोण?
कोरोना बळींवर वास्कोतील सरकारी स्मशानभूमीत आता अंत्यसंस्कार होऊ लागले आहेत. फोंडा पालिकेच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत पहिल्या दोन बळींवर अंत्यसंस्कार केल्यानंतर आतापर्यंत 30 जणांवर अंत्यंस्कार केले आहेत. मडगावातील हिंदू स्मशानभूमीच्या पदाधिकाऱयांनी मनाचा मोठेपणा दाखवत कोरोनाच्या बळींवर अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली. वास्तविक प्रत्येक नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार व्हायलाच हवेत. नतद्रष्ट लोकांकडून विरोध होत आहे म्हणून जर अंत्यसंस्कार होऊ शकत नसतील तर त्याला तेथील नगराध्यक्ष, सरपंच व पोलीस जबाबदार असतील. काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन विरोध मोडून काढून पोलिसांच्या सहकार्याने कोरोना बळींवर त्यांच्या गावातच अंत्यसंस्कार घडवून आणण्याचे मोठे सामाजिक कार्य केले आहे.
आता सरकारने याविषयी खास व्यवस्था करायला हवी, जी सर्व गावातील, शहरातील कोरोना बळींच्या नातेवाईंकांना या दुःखाच्या समयी थोडीतरी मदतीची ठरेल. मास्क न वापरणाऱयांना जसा दंड दिला जातो तसाच मोठा दंड कोरोना बळींच्या गावातील अंत्यसंस्कारास विरोध करणाऱयाला ठोठावला पाहिजे.
राजू भि. नाईक