प्रतिनिधी / कोल्हापूर
बुध्दांनी दिलेल्या धम्म म्हणजे माणसाचा शोध आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956मध्ये बुध्द धम्म स्विकारला. पण आजही बहुतांश लोक कागदोपत्री हिंदुच आहेत. म्हणूनच नागरिकत्व दुरुस्ती व नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या माध्यमातून हिंदुत्ववाद्यांकडून देशाचे नाव आणि भारतीय घटना बदलण्याचे धाडस केले जात आहे. हे रोखण्यासाठी 85 टक्के लोकांनी बौध्द धम्म स्विकारची गरज आहे, असे प्रतिपादन डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे यांनी रविवारी येथे केले.
बौध्द प्रणाली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दसरा चौक मैदानावर धम्म दिक्षा व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्म दिक्षा सोहळय़ाच्या उद्घाटनप्रसंगी ‘सध्यस्थिती पर्याय-बौध्द धम्म’ या विषयावर ते बोलत होते.
प्रा. कांबळे म्हणाले, गौतम बुध्दांनी बुध्दांनी त्रिशरण, पंचशील व अष्टांग तत्वातून जगाला प्रेरणा दिली. जग सुखी व्हायचे असेल तर बुध्दाशिवाय पर्याय नाही. विज्ञानावर आधारीत असलेला बौध्द धम्म काळानुरुप होणारे बदल स्विकारतो. त्यामुळे खेडय़ा पाडय़ात जाऊन धम्म परिषदांच्या माध्यमातून बारा बलुतेदारांनाही बुध्द धम्म स्विकारण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. हिंदुत्ववाद्यांना थांबवायचे असेल तर देश बौध्दमय होण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.
सकाळी दहा वाजता धम्म रॅलीचे उद्घाटन सिध्दार्थनगर येथे झाले. रॅलीच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, रॅलीची सांगता धम्म परिषदेच्या ठिकाणी करण्यात आली. भत्ते धम्मगुरू, भन्ते राहुल (औरंगाबाद) यांच्या हस्ते सुमारे 19 जणांना बौध्द दिक्षा देण्यात आली. ‘आम्ही भिमयात्री’ हा प्रबोधनात्मक भिगीतांच्या कार्यक्रमाने दसरा चौकात भिममय वातावरण झाले होते. सुशिलकुमार कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन स्वप्निल पन्हाळकर केले. यावेळी रघुनाथ कांबळे, बाळासाहेब भोसले, एस. पी. कांबळे, सुबोधकुमार कोल्हटकर, प्रबोधकुमार कोल्हटकर यांच्यासह आंबेडकरप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
नागरिकत्व कायदा बाराबलुतेदारांच्या विरोधात
नागरिकत्व कायदय़ाने देशभर गोंधळ घातला आहे. हा कायदा मुस्लिमांनाच नव्हे तर बारा बलुतेदारांच्या विरोधात आहे. त्यामुळे सर्वांना या कायद्याला विरोध करून संविधान वाचवण्याची गरज आहे.