किनारपट्टीवासियांनी चक्रीवादळाची दाहकता अनुभवली : 386 विद्युत खांबासह18 ट्रान्स्फॉमरची हानी
प्रतिनिधी / कारवार
अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाची दाहकता जिल्हय़ाच्या किनारपट्टीवासियांनी रविवारी सलग दुसऱया दिवशी अनुभवली. चक्रीवादळामुळे जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या पाचही तालुक्यातील जनजीवन रविवारी विस्कळीत झाले. शनिवारी चक्रीवादळाने भटकळ आणि कुमठा तालुक्यात धुमाकूळ घातला होता. रविवारी चक्रीवादळाने कारवार तालुक्यात थैमान घातले आहे. कारवार तालुक्याच्या किनारपट्टीवर शनिवारी रात्रीपासून वेगाने वाहणाऱया वाऱयामुळे आणि अधूनमधून कोसळणाऱया पावसामुळे केवळ कारवार तालुकावासियांचीच नव्हे तर शासकीय यंत्रणेची त्रेधातिरपीट उडाली आहे. तालुक्यात झपाटय़ाने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणाखाली आणावी की चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती परिणामकारकरित्या हाताळावी, अशा चक्रव्यूहात प्रशासकीय यंत्रणा सापडली आहे. प्रतितास 60 ते 70 कि. मी. वेगाने वाहणाऱया वाऱयामुळे जनता भयभीत झाली आहे. जिल्हय़ाच्या सुमारे 110 ते 115 कि. मी. लांबीच्या किनारपट्टीवर समुद्राच्या लाटांचे तांडवनृत्य सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणून गेले आहेत. उंचच उंच झेपावणाऱया समुद्र लाटांमुळे किनारपट्टीवरील अनेक ठिकाणी समुद्र झीज समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर अनेक ठिकाणी लोकवस्तीत समुद्राच्या पाण्याने शिरकाव केला आहे. जिल्हय़ातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून गणल्या जाणाऱया मुर्डेश्वर येथील समुद्र किनाऱयालगतच्या अनके टपऱयांना जलसमाधी मिळाली आहे. परिणामी टपरीमालक हवालदिल झाले आहेत.
चक्रीवादळाचा सर्वात मोठा तडाखा मच्छीमारी समाजाला बसला आहे. समुद्र लाटांच्या विळख्यात अडकून शेकडो मच्छीमारी होडय़ांची नासधूस झाली आहे. वेळेत जाळी आणि अन्य साहित्य सुरक्षित स्थळी हलविता न आल्याने किनारपट्टीवर ठिकठिकाणी जाळी समुद्रात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 27 जाळी समुद्रात वाहून गेली आहेत. तर 15 होडय़ांची नासधूस झाली आहे. तथापि, हा आकडा मोठा असल्याचे सांगण्यात आले.
हेस्कॉमला मोठा फटका
चक्रीवादळाचा मोठा फटका हेस्कॉमला बसला आहे. जोरदार वाऱयामुळे विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. शेकडो ठिकाणी झाडे आणि फांद्या विद्युत वाहिन्यांवर कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करणे शक्य नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वेळ लागणार आहे. चक्रीवादळामुळे 386 विद्युत खांब आणि 18 ट्रान्स्फॉमर्सची हानी झाली आहे. यामध्ये कारवार तालुक्यातील 76 खांबांचा आणि 14 ट्रान्स्फॉमरचा समावेश आहे. परिणामी कारवार तालुक्यातील सर्वत्र विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील वाहतुकीत व्यत्यय
कारवार तालुक्यासह शहरात जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळली आहेत. रविवारी सकाळी हब्बूवाडा येथील के. एस. आर. टी. सी. डेपोजवळ कारवार-कैगा रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळल्याने या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या व्यतिरिक्त शहरात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला आहे. हेस्कॉम अग्निशमन दलाचे आणि कारवार नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरील कोसळलेली झाडे, फांद्या हटविण्यासाठी झटत आहेत.
एकाचा मृत्यू
चक्रीवादळामुळे जिल्हय़ाच्या किनारपट्टीवर मोठी वित्तीय हानी झाली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. तथापि, भटकळ तालुक्यात चक्रीवादळामुळे एकाचा बळी गेला आहे. दरम्यान चक्रीवादळाच्या तावडीत सापडलेल्या किनारपट्टीवासियांना मदत करण्यासाठी एनडीआरएफचे पथक जिल्हय़ात दाखल झाले अहेत, असे सांगण्यात आले. तथापि या पथकाचा वावर मात्र कोठे दिसून आला नाही.
98 घरांची हानी
समुद्राच्या पाण्याच्या घुसखोरीमुळे किनारपट्टीवरील एकूण 98 घरांची हानी झाली आहे. यापैकी एक घरे पूर्णपणे कोसळले आहे. पाच घरांची मोठय़ा प्रमाणात तर 92 घरांची पूर्ण हानी झाली आहे.
किनारपट्टीवरील 31 गावे जलमय
समुद्राच्या लाटांनी लोकवस्ती प्रदेशात शिरकाव केल्याने किनारपट्टीवरील 31 गावे जलमय झाली आहेत. यामध्ये कारवार तालुक्यातील 3, अंकोला 7, कुमठा 3, होन्नावर 7 आणि भटकळ तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे. समुद्रातील पाण्यामुळे प्रभावित नागरिकांसाठी 4 गंजी केंद्रे (काळजी केंद्रे) सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये तालुक्यातील दोन आणि भटकळ व होन्नावर तालुक्यातील प्रत्येकी एक गंजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तथापि, या गंजी केंद्रांमध्ये किती कुटुबीयांना हलविण्यात आले आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.