पंतप्रधानांची सूचना : संसर्ग रोखण्यासाठी ‘कोरोना कर्फ्यू’ची हाक, ‘लॉकडाऊन’ला नकार : मुख्यमंत्र्यांसमवेत व्हर्च्युअल बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधानांच्या सूचना…
- टेस्ट, ट्रक आणि ट्रीटवर अधिक भर द्या
- मायक्रो कंटेनमेंट झोनवर विशेष लक्ष द्या
- कंटेनमेंट झोनमध्ये सर्वांच्या चाचण्या करा बाधिताच्या संपर्कातील 30 जणांची चाचणी करा
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात पुन्हा एकदा एक आव्हानात्मक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा लोक बेजबाबदार दिसत आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी गुरुवारी देशवासियांना सतर्क करण्याचा इशारा दिला. तसेच देशातील कोरोना साथीच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यांना संक्रमणाचा प्रसार रोखण्याचा सल्ला देत 11 ते 14 एप्रिल दरम्यान ‘टीका उत्सव’ (विशेष लसीकरण मोहीम) साजरा करण्याची सूचना केली. त्याचबरोबर चाचण्या वाढवण्याची सूच्ना आणि ‘कोरोना कर्फ्यू’ची हाक देत नियमांची कडक अंमलबजावणी करण्याकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्लाही दिला.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हर्च्युअल संवाद साधला. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनाही ऐकून घेतल्या. देश कोरोनाच्या पहिल्या टप्प्याच्या पुढे निघून गेला आहे. बरीच राज्ये यापूर्वीच पहिल्या टप्प्यातील सर्वोच्च पातळीच्या पुढे गेली आहेत. तर अनेक राज्ये या दिशेने वाटचाल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाईट कर्फ्यूला पाठिंबा दिला आहे. मात्र नाईट कर्फ्यूला आपण ‘कोरोना कर्फ्यू’ हा शब्द वापरायला हवा, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. नाईट कर्फ्यू म्हटल्यावर लोक कोरोना फक्त रात्रीच पसरतो का? असा प्रश्न करत असल्याने आता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्याला ‘कोरोना कर्फ्यू’ असे संबोधण्याची सूचना केली.
‘कोरोना कर्फ्यू’ रात्री 10 वाजता सुरू करुन सकाळपर्यंत ठेवला पाहिजे. लोकांना सावध करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. आपल्याला टेस्ट, ट्रक आणि ट्रीट यावर भर द्यावा लागेल. मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देणे गरजेचे आहे. कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येकाची कोरोना टेस्ट झाली पाहिजे. याचा जरुर फायदा होईल. एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या संपर्कात येणाऱया कमीतकमी 30 जणांची तपासणी केली पाहिजे, अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या.
संक्रमणाचा वेग रोखण्याची गरज
आजच्या बैठकीमध्ये काही गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट आहेत. चिंतेची बाब म्हणजे लोक अधिक बेजबाबदार बनले आहेत. कोरोनाचे वाढते संक्रमण मोठी समस्या निर्माण केली आहे. त्याकडे आपल्याला विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण पूर्वीपेक्षा आणखी वेगवान आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश आणि गुजरात यासह अनेक राज्यांनीही पहिल्या लाटेची सर्वोच्च पातळी पार केली आहे. यंदाची परिस्थिती पहिल्यापेक्षा कमी आव्हानात्मक आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी आज आपल्याकडे पूर्ण व्यवस्था आहे. मास्क ते लस सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तसेच मागील वर्षीचा मोठा अनुभवही गाठीशी असल्यामुळे कोणीही न घाबरता या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांसोबत यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.