प्रतिनिधी / चिपळूण
संचारबंदी असतानाही चिपळुणात काही वाळूमाफियांनी थैमान घातला आहे. नियमधाब्यावर बसवून गोवळकोट खाडीत राजरोसपणे वाळू उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीछुपे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या तब्बल ९ बोटींवर गुरूवारी रात्री येथील महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत त्या बोटी खाडीतच बुडवल्या. तालुक्यातील ही मोठी कारवाई समजली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामे ठप्प असून महसूल प्रशासन व पोलीस यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या कामात गुंतली आहे. याचगोष्टीचा फायदा चिपळुणातील काही वाळू व्यावसायिकांनी उचलला आहे. गोवळकोटसह काही भागात खाडीमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचे काही प्रकार समोर आले होते. त्यांच्यावर वाळू जप्तीसह दंडात्मक कारवाई व पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. या कारवाईतून अवैध वाळू उत्खननाला चाप बसेल अशी आशा व्यक्त केली जात असतानाच गुरुवारी नवा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गोवळकोट खाडीत बेकायदा वाळू उपसा होत असल्याची ओरड सुरू होती. याची दखल घेऊन प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, चिपळूण मंडल अधिकारी यु. आर. गिज्जेवार, आर. पी. मोहिते, जे. पी. क्षीरसागर यांचे पथक गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गोवळकोट, कालुस्ते आदी ठिकाणी खाडीकिनारी गस्त घालत होते. यावेळी गोवळकोट खाडीत बेकायदा वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे महसूल विभागाच्या पथकाने दुसऱ्या बोटीने वाळू उपसा होत असल्याच्या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांची बोट आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच बोटींवरील कामगारांनी बोटींसह किनाऱ्याच्या दिशेने पलायन केले. त्या बोटी तेथेच सोडून पोबारा केला. महसूल विभागाचे अधिकारीदेखील या बोटींच्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. यानंतर या बोटींची पाहणी केली असता ९ बोटींमध्ये प्रत्येकी सुमारे २ ब्रास वाळू आढळून आली. त्यांनी ती माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना दिली.
याबाबत माहिती मिळताच या दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नंतर अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत कार्यवाही करण्यास सांगितले. यामध्ये या बोटी बेवारस असल्याचे निदर्शनास आले. कोणीही या बोटींची मालकी सांगण्यासाठी पुढे आले नाही. यामुळे या प्रकरणी कोणावर दंडाची कारवाई अथवा गुन्हा दाखल करायचा असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. शेवटी अशा बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी अधिकार्यांनी त्या ९ बोटी खाडीतच बुडवत मोठी कारवाई केली. सुमारे सात तास ही कारवाई सुरु होती. या बेधडक कारवाईचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.