चेन्नई
वैमानिकाच्या सावधगिरीमुळे तामिळनाडूत नुकतीच मोठी विमान दुर्घटना टळली. एअर इंडियाचे दिल्लीहून चेन्नईला येणारे विमान विमानतळावर उतरणार होते. याचदरम्यान पायलटला सुमारे 50 मीटर अंतरावरून धावपट्टी पाण्याने भरल्याचे दिसले. वैमानिक आणि सहवैमानिकाने तातडीने विमानाचे लँडिंग अन्यत्र करण्याचा निर्णय घेतला. वैमानिकाच्या या निर्णयामुळे मोठा अपघात टळला. यावेळी विमानात 429 प्रवाशी होते. विमानाच्या पायलटनी इमर्जन्सीमध्ये घेतलेल्या या निर्णयाचे प्रथम प्रवाशांना आश्चर्य वाटले. पण जेव्हा संपूर्ण घटनेची माहिती प्रवाशांना दिल्यानंतर त्यांनी विमानाचे पायलट कॅप्टन मोहपात्रा आणि सहवैमानिक राजा पोन्नुस्वामी यांचे कौतुक केले. काही प्रवाशांनी एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना टॅग करत दोन्ही वैमानिकांचे कौतुक केले.