बिमस्टेकमध्ये भाषण करताना पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या जगाची व्यवस्था अस्थिरतेच्या भोवऱयात सापडली आहे. यातून सावरण्यासाठी बिमस्टेकसारख्या संघटनांनी एकमुष्ट होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. ते या संघटनेच्या परिषदेत भाषण करीत होते. या संघटनेची ही पाचही शिखर परिषद आहे. या संघटनेत बांगला देश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि जपान या देशांचा या संघटनेत समावेश आहे.
सध्या युपेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे. यामुळे जगाची आर्थिक स्थिती विस्कटण्याची शक्यता आहे. तेलाचे दर भरमसाठ वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद होत आहे. याचा अप्रत्यक्ष संदर्भ घेत पंतप्रधान मोदींनी जगाच्या परिस्थतीवर भाष्य केले. बिमस्टेक ही संघटना या स्थितीत महत्वाची भूमिका बजावू शकते. संघटनेच्या सदस्य देशांनी एकत्रितपणे कार्य केल्यास या कठीण स्थितीतही आशेचा किरण दिसू शकतो. परिषदेच्या सचिवालय स्थापनेसाठी भारत 1 दशलक्ष डॉलर्सचे अर्थसाहाय्य देण्यास तयार आहे. भारत आपल्या सुरक्षेला प्राधान्य देत असून आंतरराष्ट्रय राजकारणातही महत्वाची भूमिका स्वीकारत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
आर्थिक उन्नती आवश्यक
बिमस्टेक देशांनी परस्पर सहकार्याने आर्थिक प्रगती साध्य केली पाहिजे. यासाठी सदस्य देशांमधील उद्योजकांनी एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहेत. व्यापारासाठी संघटनेच्या सदस्यांनी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. योग्य कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून व्यापार, उद्योग, लोकसंपर्क आदी बाबी साध्य करता येतात. आसियन विकास बँकेचा ही यंत्रणा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना आपण सहकार्य केले पाहिजे. सागरी वाहतूक यंत्रणा निर्माण करण्यासाठी एका कायदेशीर व्यवस्थेची आवश्यकता असून सदस्य देश त्या दिशेने कार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी भाषणात व्यक्त केली.
राजपक्षे यांना शुभेच्छा
या संघटनेचे जे देश एकमेकांना लागून आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय महामार्गांचे जाळे विकसीत करण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे पुरवठा साखळी वेगवान रितीने कार्यरत होईल आणि व्यापार तसेच आयात निर्यातीत वृद्धी होईल. आता या संघटनेची सूत्रे श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्याकडे जात आहेत. संघटना त्यांचे स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा देते, असेही प्रतिपादन त्यांनी केले.