ऑनलाईन टीम / जळगाव :
जळगाव जिल्ह्यातील रावेरे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या कोणी आणि कशी केली याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र, ह्या हत्याकांडाने संपूर्ण जळगाव हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मध्यप्रदेशातील मूळ गावी गेले आहे. मात्र, शेतातील घरात ही चार भावंडे एकटीच राहत होती. रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांची कुर्हाडीने हत्या करण्यात आली. आज सकाळी शेतमालक शेतात आल्याने हा सगळा प्रकार उघड झाला.
सविता मेहताब भिलाला (वय 14), राहुल (वय 11), अनिल (वय 8 ) आणि राणी (वय 8 ) अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. या लहान मुलांची का हत्या करण्यात आली, याचे कारण उलगडलेले नाही. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.