प्रतिनिधी / वास्को
लॉकडाऊनच्या पाश्वभूमीवर गोव्यातील ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू पाहोचवण्यासाठी मोटरसायकल टॅक्सी पायलटांचा वापर करण्याची सुचना वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी वाहतुक व पंचायत खात्याच्या संचालकांना केली आहे. औद्योगिक वसाहतीमधील उद्योग कडक नियंत्रणाखाली खुले करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करीत असल्याचेही वाहतुकमंत्र्यांनी म्हटले आहे.
दाबोळी मतदारसंघात एमपीटीच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या परिसर निर्जंतुकीकरण उपक्रमाची पाहणी वाहतुकमंत्री गुरूवारी केली. यावेळी ते प्रसिध्दी माध्यमांसमोर बोलत होते. मंत्री गुदिन्हो म्हणाले की, जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार सर्व आवश्यक प्रयत्न करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी मालवाहतुकीसाठी राज्याच्या सिमा खुल्या करण्यात आलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात मोटरसायकल पायलटांची स्थिती काय झालेली असेल याची सरकारला कल्पना आहे. त्यामुळेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणात सहभागी करून घेऊन त्यांची आर्थिक समस्याही सोडवणे शक्य आहे. गोव्यातील गावागावांत हे मोटरसायकल पायलट जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. वाहतुक खाते तसेच पंचायत खात्याच्या संचालकांना मोटरसायकल पायलटांना अशा कामांत गुंतवण्यासाठी प्रस्ताव तयार करा व हा प्रस्ताव राज्य कार्यकारी समितीसमोर येत्या बैठकीपूर्वी मांडा अशी सुचना आपण केल्याचे सांगितले. तसेच वाहतुकमंत्री म्हणाले की, राज्य सरकार गोव्यातील उद्योगिक वसाहतीतील उद्योग नियंत्रीतरीत्या खुले करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी खबरदारीही घावी लागणार आहे. सामाजीक अंतराचे भान ठेवावे लागणार आहे. आपल्या कर्मचारी व कामगारांची तपासणीसाठीची सुविधाही संबंधीत उद्योगांनीच उपलब्ध करावी अशी सुचना त्यांना करण्यात येणार आहे.
झुआरी पुलाच्या कामावरही कोरोनाचा परीणाम
कोरोना संसर्गाच्या भितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परीणाम झुआरी पुलाच्या कामावरही होणार असल्याचे वाहतुकमंत्री स्पष्ट केले. सद्यस्थितीमुळे पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आता थोडा अधिक वेळ लागणार आहे. या पुलाच्या कामाशी संबंधीत चिन आणि फान्समधील पुरवठादार आणि आरेखन तज्ञ यांना गोव्यातील त्यांचा नियोजित प्रवास सद्या उद्भभवलेल्या स्थितीत रद्द करावा लागलेला आहे. त्याच प्रमाणे दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सॅपरेटर उड्डाण पुल प्रकल्पाचे उद्घाटनही लांबणीवर टाकावे लागलेले आहे असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
विरोधकांनी राजकारण बाजुला ठेवण्याचे आवाहन
दरम्यान, मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना सद्या निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीच्या काळात विरोधकांनी राजकारण बाजुला ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा सामुहिक संसर्ग होऊ नये यासाठी लोकांनी खबरदारी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच सामाजीक माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा चुकीच्या उद्देशाने कुणी वापर करू नये असेही आवाहन त्यानी केले आहे. ख्रिश्चन बंधुभगीनीनी आपल्या घरीच थांबून कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी प्रार्थना करावी. या कठीण काळात अगदी जबाबदारी आपले कर्तव्य बजावणारे पोलीस, आरटीओ, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, सफाई कर्मचारी, इतर सरकारी कर्मचारी व इतरांचे त्यांनी आभार मानले आहेत.