शहराच्या प्रश्न, समस्यांवर भाष्य करणारा मुक्त पत्रकार काळाच्या पडद्याआड
प्रतिनिधी/कोल्हापूर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मुक्त पत्रकार शरद दत्तोबा तांबट (वय 71, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रविराज, दोन मुली, दोन भाऊ, भावजय, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज गुरूवारी (दि. 24) सकाळी 9:30 वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे.
स्वातंत्र्यसैनिक दत्तोबा तांबट आणि भागिरथी तांबट यांचे कनिष्ठ पुत्र असणाऱया शरद तांबट यांचा सामाजिक कार्यात सहभाग होता. मुक्त पत्रकार म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर विपुल लेखन केले. अंबाबाई मंदिर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ते आग्रही होते. अंबाबाई भक्त मंडळाच्या आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. एलआयसी एंजट म्हणून व्यवसाय करत असताना त्यांनी पंचवीसहून अधिक वर्षे पांजरपोळ येथील लघुउद्योजक संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. लहान, मध्यम उद्योगजक, कारखानदारांच्या प्रश्नांची सरकार दरबारी, महापालिकेच्या स्तरावर मांडणी केली. ‘1942 च्या स्वातंत्र्यलढय़ातील कोल्हापूरचे शिलेदार’ हे पुस्तक लिहून त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास नव्यापिढीपुढे आणला. यासाठी त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांकडून परिश्रमपूर्वक माहिती संकलन केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांच्या संघटनेची स्थापना करून उपक्रम राबविले. डाŸ. निशिकांत तांबट व लेखक प्रभाकर तांबट यांचे ते बंधू होत.
‘तरुण भारत’शी स्नेह
शरद तांबट यांचा ‘तरुण भारत’ परिवाराशी स्नेह होता. कोल्हापूर शहराच्या विविध प्रश्न, समस्यांवर त्यांनी ‘तरुण भारत’ मधून लेख लिहले होते. त्यांचे प्रबोधनात्मक लेखही गाजले होते. तांबट यांच्या निधनाने शहराच्या संस्कृतीची, समस्यांची जाण असलेला शिवाजी पेठेच्या मातीतील हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.