सुरळीपणे पार पडली परीक्षा : केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी बेळगावमध्ये सुरळीतपणे पार पडली. परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींसोबत गैरहजेरींची संख्याही अधिक होती. एकूण 1 हजार 55 विद्यार्थ्यांनी टीईटीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.
राज्यातील शिक्षण विभागातर्फे रविवारी टीईटी घेण्यात आली. बेळगाव शहरातील विविध 29 केंद्रांवर ही परीक्षा झाली. परीक्षेदरम्यान कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कर्नाटकात पीएसआय भरती, त्यानंतर प्राध्यापक भरतीमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा काटेकोरपणे घेण्यात आली.
सकाळच्या सत्रात 5 हजार 686 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
सकाळच्या सत्रात 9.30 ते 12 या वेळेत प्राथमिक विभागासाठीचा पहिला पेपर पार पडला. 6 हजार 201 परीक्षार्थींनी पेपरसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 हजार 686 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 515 जण गैरहजर होते. दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागासाठीचा पेपर पार पडला.
दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 या वेळेत हा पेपर पार पडला. या पेपरसाठी 7 हजार 874 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 7 हजार 334 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर 540 परीक्षार्थी गैरहजर होते. परीक्षागृहामध्ये परीक्षार्थीना घडय़ाळ, बूट व बेल्ट घालण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर हे साहित्य काढून परीक्षार्थींना केंद्रावर जावे लागत होते.
परीक्षा देणाऱयांमध्ये महिलांची संख्या अधिक
बेळगाव शहरातील 29 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यामुळे रविवारी शहरात सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती. परीक्षा देणाऱयांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय परीक्षा केंद्रांबाहेर तान्हुल्यांसह उभे होते. बस, रेल्वेने अनेकजण शहरात दाखल होत होते.