प्रतिनिधी / चिपळूण :
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या विशेष तपासणीसाठीच्या खर्चाला मान्यता मिळत नसेल किंवा तेवढे पैसे नगर परिषदेकडे नसतील तर आम्ही चिपळूणकरांकडे झोळी घेऊन फिरू, पण नाटय़गृह तत्काण् सुरू व्हावे अशी मागणी नाटय़कलावंतांनी गुरूवारी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. चांगल्या कामात राजकारण आणून सांस्कृतिक वारसा का पुसताय, असा सवाल युवा कलाकारांनी उपस्थित केला.
15 वर्षापासून बंद असलेल्या नाटय़गृहाचे काम पूर्ण झाले आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाटय़गृहात आता राजकारण शिरले आहे. त्यामुळे नाटय़प्रेमी पेटून उठले आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर प्रतिष्ठान, कनक पेंड सर्कल, ओंकार नाटय़ संस्था व आम्ही चिपळूणकर हौशी रसिक कलावंत यांच्यावतीने याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा खेराडे, नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, आशिष खातू, नगरसेविका रसिका देवळेकर, वर्षा जागुष्टे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांच्यासोबत भाऊ कार्ले, मीरा पोतदार, ऋग्वेद खातू, योगेश कुष्टे, मयुरेश भागवत, सुनील जोशी, संतोष केतकर, प्रमोद चौधरी, आनंद साठे, योगेश कुष्टे, मकरंद डाकवे, मृण्मयी ओक, स्कंदा चितळे, सानिका म्हसकर, मानस साखरकर, अमेय चितळे, अजय लाड, दिलीप आंबेकर, विश्वास सुतार यांची बराच वेळ चर्चा झाली.
यावेळी उद्घाटनाला विलंब का असा सवाल करण्यात आला. यावेळी खेराडे यांनी आम्ही केंद्राचे काम इथपर्यंत आणून ठेवले. मात्र सुरू असलेले राजकारण आपण पहातच आहात. विरोधकांचे सहकार्य मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत उद्घाटन कसे करणार असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी मोरे यांनी केंद्राचे काम वैशिष्टपूर्ण निधीतून होत असून त्याला 6 कोटी 97 लाख 55 हजार इतका खर्च आला आहे. त्याची 12 अंदाजपत्रके तयार झाली आहेत. ठेकेदाराला आतापर्यंत 4 कोटी 50 लाख रूपये देण्यात आले असून उर्वरित 2 कोटी 70 लाख रूपये देणे बाकी आहे. सर्व कामांना व देयके अदा करताना सभागृहाचे ठराव घेण्यात आले. त्या-त्यावेळी तपासणी झाली, थर्डपार्टी ऑडीटही झाले आहे. काही किरकोळ कामांसाठी 58 लाख रूपयांची निविदा प्रक्रिया राबवयाची आहे. मात्र सध्याच्या घडामोंडीमुळे ते काम प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर उपस्थित नाटय़रसिक भडकले. सांस्कृतिक राजधानीचा वारसा नष्ट करण्याचे काम राजकारणी करत आहेत. नाटक बघायला रत्नागिरीत जातो, त्यावेळी चिपळूणकर असल्याचे सांगायला लाज वाटते. पूर्वी येथे राज्य नाटय़ स्पर्धांचे केंद्र होते. आता कोणत्याही स्पर्धा होत नाही, ही शोकांतिका आहे. युवा कलावंतांना दाबण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.